देशभरात भाजपा आणि मित्रपक्षांची हवा असतानाच शिरुर मतदारसंघात मात्र शिवसेना-भाजपा युतीला धक्का देणारा निकाल लागला. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी पराभव केला. कोल्हे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांना खासदारकीसाठी तिकीट जाहीर झाले. अगदी प्रचाराच्या दिवसांपासून अमोल कोल्हे यांनी आढळरावांना कडवं आव्हान दिलं होतं. या विजयानंतर 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेचे दिग्दर्शक कार्तिक केंढे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली. 'अमोल कोल्हे विजयी, मराठी कलावंत विजयी,' असं लिहित त्यांनी शुभेच्छा दिल्या. मराठी कलावंत विजयी झाल्याबद्दल अभिमान वाटत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या घराबद्दलचा वाद समोर आला होता. जर, अमोल कोल्हेंची संपत्ती पाच कोटी रुपये आहे, तर मग त्यांनी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिकेसाठी त्यांनी घर गहाण ठेवल्याची अफवा असल्याचं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं होत. त्यावेळीही फेसबुकवर खुलं पत्र लिहित कार्तिक केंढे यांनी कोल्हेंना साथ दिली होती. शिरुर मतदारसंघातील एकूण १२ लाख ८६ हजार २२६ मतांपैकी अमोल कोल्हे यांना ४९.१७ टक्के मते मिळाली. कोल्हे यांचे प्रमुख विरोधक असणाऱ्या अढळराव पाटील यांना ४४.६४ टक्के म्हणजेच ५ लाख ७४ हजार १६४ मते मिळाली. कोल्हे यांनी ५८ हजार २७८ मतांनी अढळराव यांचा पराभव केला.