छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. ही मालिका जवळपास १२ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राची वेगळी अशी ओळख आहे. पण येत्या भागांमध्ये सोधीची भूमिका साकारणारे गुरुचरण सिंह हे मालिकेत दिसणार नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांनी मालिका सोडली असल्याचे म्हटले जात आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार गुरुचरण यांनी मालिका सोडली आहे. लॉकडाउननंतर त्यांनी मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात केली नाही. तसेच त्यांच्या या भूमिकेसाठी शाहरुख खानचे कोस्टार अभिनेते बलविंदर सिंह पूरी यांना विचारण्यात आले असल्याचे म्हटले जाते.

बलविंदर सिंह यांनी ‘दिल तो पागल है’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात त्यांनी शाहरुखच्या मित्राची भूमिका साकारली होती. जर त्यांनी या भूमिकेसाठी होकार दिला तर ते मालिकेच्या आगामी भागांमध्ये ते दिसण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

पाहा : जेठालालवर भुरळ घालणाऱ्या बबिताचा चर्चेत असलेला ग्लॅमरस लूक पाहिलात का?

पाहा : ‘तारक मेहता…’मधील बबिता घेते एका एपिसोडसाठी इतके मानधन

यापूर्वी मालिकेचे निर्माते असीत मोदी यांनी ‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या सर्व अफवा असल्याचे म्हटले होते. ‘मला माहित नाही या अफवा कुठून सुरु झाल्या आहेत. मला सोधीने कोणतेही लेटर पाठवलेले नाही’ असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे गुरुचरण यांनी मालिका सोडण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

२८ जुलै रोजी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. गुरुचरण यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. मालिकेच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. चाहत्यांचे आभार’ असे त्यांनी म्हटले होते.