छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका कोणती असा प्रश्न विचारल्यास ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हे नाव आवर्जून ऐकायला मिळेल. अगदी पहिल्या एपिसोडपासून या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेचे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. म्हणूनच तब्बल तीन हजार एपिसोड्स पूर्ण करण्यात या मालिकेला यश मिळणार आहे. त्याचे निर्माते असित कुमार मोदी यांनी ट्विट करत हा आनंद व्यक्त केला.

असित कुमार मोदी यांनी ट्विट केलं, ‘प्रिय प्रेक्षकांनो, येत्या २४ सप्टेंबर रोजी आमची मालिका ३००० एपिसोड्स पूर्ण करणार आहे.’ त्यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव तर केलाच. पण त्याचसोबत त्यांना अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला. तो प्रश्न म्हणजे मालिकेत दयाबेन अर्थात अभिनेत्री दिशा वकानीची एण्ट्री कधी होणार? दयाबेन या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली दिशा हिने २०१८ मध्ये गरोदरपणाचं कारण देत मालिका सोडली होती. त्यानंतर ती मालिकेत परतलीच नाही. दिशाला मालिकेत पुन्हा आणण्यासाठी निर्मात्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र तिला आणण्यात अजूनही निर्मात्यांना यश मिळालं नाही.

आणखी वाचा : “..त्यामुळे मला फार दु:ख झालं”; सोनू सूदने सांगितलं ‘मणिकर्णिका’ सोडण्यामागचं खरं कारण

दिशाने मालिकेत पुनरागमन करण्यासाठी बऱ्याच अटी ठेवल्याचं निर्मात्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. मात्र याबाबत दिशाने अद्याप काही वक्तव्य केलं नाही.