देशात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कठोर निर्बंधही घालण्यात आले आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक चित्रपटांचं चित्रीकरण थांबलं आहे तर अनेक चित्रपटांचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. 'चेहरे' चित्रपटही सध्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्युनंतर चर्चेत आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीही या चित्रपटात दिसणार आहे. या संदर्भात निर्मात्यांनी आपली भूमिका मांडली आहे. 'चेहरे' चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर रियाचं नाव नसल्याबद्दल जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, मला तिच्या नावाचा उल्लेख न करण्यामागे काहीही कारण दिसत नाही. ती चित्रपटातल्या ८ कलाकारांपैकी एक आहे. आम्ही तिला खूप आधी साईन केलं होतं आणि तिने समाधानकारकरित्या तिचं काम पूर्ण केलं आहे. चित्रपटाच्या व्यावसायिक फायद्यासाठी रियाच्या परिस्थितीचा गैरफायदा घ्यायचा नाहीये. म्हणूनच आम्ही दुसऱ्या पोस्टरमध्ये तिच्या नावाचा उल्लेख करणं टाळलं. तिच्या आयुष्यात ती बऱ्याच गोंधळाला सामोरी गेली आहे. आम्हाला त्यात भर घालायची नाही. आम्ही तिला तेव्हाच समोर आणलं जेव्हा तिला ते सोयीस्कर वाटलं. 'चेहरे' या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत या चित्रपटात अन्नू कपूर, क्रिस्टल डिसुझा, ध्रितीमन चटर्जी, रिया चक्रवर्ती आणि इतर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट ९ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण आता त्याचं चित्रीकरण लांबणीवर पडलं आहे.