अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. सुशांतच्या आत्महत्येचं खरं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं,तरीदेखील कलाविश्वातील घराणेशाहीला कंटाळून त्याने जीवन संपवल्याचं म्हटलं जात आहे. यात सुशांतच्या चाहत्यांनी स्टारकिड्सवरदेखील निशाणा साधला आहे. मात्र अभिनेता जॅकी श्रॉफ याच्या मुलाने म्हणजेच अभिनेता टायगर श्रॉफने याप्रकरणी त्याचं मत मांडलं आहे. स्टारकिड असल्यामुळे कलाविश्वात वावरताना कायम दबाव असतो, असं त्याने म्हटलं आहे.

आपल्या अॅक्शन सीनसाठी ओळखला जाणारा अभिनेता टायगर श्रॉफने हिरोपंती या चित्रपटाच्या माध्यमातून २०१४ मध्ये कलाविश्वात पदार्पण केलं. ‘बागी’, ‘वॉर’,’मुन्ना मायकल’, ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’, अशा काही चित्रपटांमध्ये टायगरने काम केलं आहे. मात्र, त्याच्या अभिनयाची भूरळ प्रेक्षकांवर फारशी पडली नाही.परंतु, या क्षेत्रात का करत असताना स्टारकिड असल्यामुळे बऱ्याच वेळा मनावर दबाव असतो, असं त्याने सांगितलं.

“जॅकी श्रॉफ यांचा मुलगा असल्यामुळे आणि एक स्टारकिड असल्यामुळे कायम माझ्यावर काम करताना दबाव होता. लोकांना वाटतं की स्टारकिड असणं सहज-सोपं काम आहे. पण, तसं प्रत्यक्षात नसतं. मी खोटं सांगणा नाही, पण सतत डोक्यात हा विचार घोळत असतो. जे स्टाककिड आहेत आणि त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे, त्यांच्यासाठी हे सारं सोपं आहे. मीदेखील माझ्या वडिलांच्या छत्रछायेतून मी बाहेर पडलो”, असं टायगर म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “माझ्या वडिलांनी जवळपास ३० वर्ष या क्षेत्रात काम केलं आहे. त्यांनी करिअरमध्ये येणारे चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळेच त्यांनी मला कायम सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता मी स्वत:चं या विश्वात नाव कमावलं आहे. त्यामुळे अनेक जण सहज माझ्यावर टीका करतात. माझ्यावर काही मीम्सदेखील तयार होता आणि लोक मला ट्रोलही करतात. मात्र या सगळ्याकडे मी सकारात्मकतेने पाहतो. मला राग किंवा वाईट वाटत नाही. मी ते मीम्स एन्जॉय करतो”.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर कलाविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. अनेकांच्या मते, त्याने नैराश्यात येऊन आत्महत्या केली. तर काहींच्या मते, बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने जीवन संपवलं. यात अनेकांनी करण जोहर, सलमान खान यांच्यावर घराणेशाहीचा आरोपही केला आहे. इतकंच नाही तर स्टारकिड्सवरदेखील निशाणा साधला आहे.