रोज एका विशिष्ट वेळेत प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचणाऱ्या मालिका या प्रेक्षकांसोबत एक अनोखं नातं जोडत असतात. मालिकांचा एकापेक्षा एक सुंदर एपिसोड तयार होतो, त्यांचे अनेक भाग यशस्वीपणे पूर्ण होतात या मागचे कारण कलाकार-तंत्रज्ञान यांची मेहनत आहेच. पण प्रेक्षकांचा मालिकेवर असणारा विश्वास याचा देखील मोलाचा वाटा आहे. याच प्रेमाच्या सोबतीने आणि प्रेक्षकांच्या विश्वासाने झी युवा वरील ‘तुझं माझं जमतंय’ या मजेशीर आणि मनोरंजक मालिकेने नुकतेच १०० एपिसोड्स पूर्ण केले आहेत.

‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेत सनई चौघडे वाजू लागले आहेत. म्हणजेच या मालिकेत लवकरच इंटरेस्टिंग भाग पाहायला मिळणार आहे. कारण आशू आणि शुभंकर यांचे शुभ मंगल होणार असून त्यांच्या लग्नासाठी खुद्द पम्मीने पुढाकार घेतला आहे. आता पम्मी यांचं लग्न लावून देणार म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट आपसूक आलीच. हे नवीन भाग देखील प्रेक्षकांना कथेशी आणि मालिकेशी जोडून ठेवतील. या मालिकेच्या स्पेशल एपिसोड्सच्या निमित्ताने पहिल्यांदा संपूर्ण शूटिंग नगरमध्ये झाले आहे.

सध्या करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मालिकेच्या सेटवर प्रत्येक जण योग्य ती काळजी घेतोय. अशा परिस्थितीत काय हवं असतं तर एकमेकांची साथ… जर एकी असेल तर काम हे जास्त चांगल्या पद्धतीने पूर्ण होतं अशीच एकी ‘तुझं माझं जमतंय’च्या टीममध्ये आहे, असं निर्माते स्वप्निल मुनोत यांनी सांगितले. पडद्यावरील चेहरे, कलाकार रोशन विचारे, मोनिका बागुल, प्रतीक्षा जाधव आदी आणि पडद्यामागचे कलाकार या सर्वांचा या मालिकेच्या यशामध्ये महत्त्वाचा वाटा आहे.