'स्वराज्यरक्षक संभाजी'नंतर आता झी मराठी वाहिनीवर 'तुला पाहते रे' व 'जय मल्हार' या दोन लोकप्रिय मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लॉकडाउनमुळे सर्व शूटिंग बंद असल्याने गाजलेल्या मालिका पुन्हा प्रसारित केल्या जात आहेत. येत्या ६ एप्रिलपासून या दोन्ही मालिका पुन्हा सुरू होणार आहेत. ६ एप्रिलपासून दुपारी १२ वाजता 'तुला पाहते रे' आणि संध्याकाळी सहा वाजता 'जय मल्हार' पाहायला मिळणार आहे. 'तुला पाहते रे' मालिकेतील विक्रांत सरंजामेची भूमिका साकारणारा सुबोध भावे व इशा निमकरची भूमिका साकारणारी गायत्री दातार यांच्यातील केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. गायत्रीने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. गेल्या वर्षी जून महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियता मिळवली होती. तर दुसरीकडे अवघ्या महाराष्ट्राचं अराध्यदैवत असलेल्या श्री खंडेरायांची चरित्रगाथा सांगणारी ‘जय मल्हार’ ही मालिकासुद्धा घराघरांत लोकप्रिय झाली होती. या मालिकेने छोट्या पडद्यावर एक इतिहासच रचला. मालिकेसोबतच यातील कलाकारांना म्हणजेच मल्हार देवाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे, म्हाळसाबाईंच्या भूमिकेतील सुरभी हांडे आणि बानूबाईंच्या भूमिकेतील ईशा केसकर यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे. अत्यावश्यक वस्तूंची खरेदी वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. लॉकडाउनच्या काळात घरबसल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जुन्या गाजलेल्या मालिका पुन्हा प्रक्षेपित केल्या जात आहेत.