बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची 'तांडव' ही सीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याप्रकरणी देशभरातून या सीरिजला विरोध केला जात आहे. यामध्येच ही सीरिज बॅन करावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरु लागली आहे. या सीरिजला सर्व स्तरांमधून होत असलेला विरोध लक्षात घेता या सीरिजमध्ये बदल करण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ट्विट करत सीरिजमध्ये बदल करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. कोणाच्या भावना दुखावण्याचा आमच्या हेतू नव्हता. पण जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही माफी मागतो. तसंच 'तांडव'मधील आक्षेपार्ह दृश्यात योग्य ते बदल केले जातील असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. pic.twitter.com/15LC6la7QF — ali abbas zafar (@aliabbaszafar) January 19, 2021 दरम्यान, 'तांडव' सीरिजच्या पहिल्याच एपिसोडमध्ये हिंदू देव-देवतांची हेटाळणी करण्यात आली आहे. हा भाग पाहिल्यानंतर अनेकांनी ही सीरिज बॅन करण्याची मागणी केली. देशभरातून या सीरिजला विरोध होत असतानाच राजकीय वर्तुळातूनदेखील या सीरिजचा निषेध करण्यात आला. यात भाजपा नेते राम कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही विरोध दर्शविला.