|| गायत्री हसबनीस
१९८३ साली भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेला विश्वचषक, त्या विजेतेपदाचा तो रोमाचंक अनुभव आणि प्रत्येक खेळाडूच्या मनातील त्या हळव्या तसंच अभिमानी क्षणांच्या आठवणी ‘८३’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची आणि खासकरून नव्या पिढीची मने जिंकून घेतली आहेत. ‘सिटी ऑफ ड्रीम्स २’ च्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेता आदिनाथ कोठारे ‘८३’ मधून नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला आहे. लोकप्रिय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांची भूमिका आदिनाथने केली आहे. ‘८३’ या सिनेमाचा भाग होण्यापासून ते दिलीप वेंगसरकरांची भूमिका रंगवण्यापर्यंतचे अनुभव, किस्से याबद्दल आदिनाथने ‘लोकसत्ता’शी भरभरून गप्पा मारल्या.
‘‘प्रचंड आनंद… प्रचंड आनंद होतो आहे. हा चित्रपट अखेर दीड वर्षांच्या कालावधीनंतर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे,’’ अशा शब्दांत आदिनाथ आपला आनंद व्यक्त करतो. खरंच आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. या महामारीने आपल्याला संयम बाळगायला शिकवला आहे आणि अर्थात त्या संयमाचे फळ म्हणजे या चित्रपटाचे प्रदर्शन. २० एप्रिल २०२०ला जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होणार होता तेव्हा आम्ही अक्षरश: वेडे झालो होतो. खूप उत्सूक होतो. प्रामाणिकपणे सांगायचं तर या विषयाचं महत्त्वच इतकं मोठं आहे, मुळात ही घटनाच कालातीत अशी आहे. आणि आता प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यासाठी ८३च्या विजयाइतका दुसरा चांगला विषय असूच शकत नाही, हे सांगताना आदिनाथचा आनंद ओसंडून वाहात असतो.
क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर हे इतकं मोठं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची भूमिका साकारायची तेही देशाच्या इतिहासातील सुवर्णपान असलेल्या १९८३च्या विश्वचषक विजयाच्या घटनेविषयी बोलणाऱ्या चित्रपटात… इतकी उत्तम संधी आदिनाथकडे चालून आली. कलाकार म्हणून भूमिकेची तयारी, दडपण आणि अभ्यास याविषयी बोलताना आदिनाथ म्हणतो, ‘‘दिलीप वेंगसरकर हे संपूर्ण जगाला ज्ञात असलेलं व्यक्तिमत्त्व. हे सर्वच खेळाडू क्रिकेट विश्वातील दिग्गज आहेत. सातत्याने इतकी वर्षं लोकांच्या मनात अधिराज्य गाजवून आहेत, त्यांची खेळण्याची शैली लोकांनी परिचयाची आहे. त्यांनी ती प्रत्यक्षात पाहिलेली आहे, त्यामुळे दिलीप वेंगसरकर यांची भुमिका निभावताना मी त्यांची देहबोली नीट आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. ते माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे होते, कारण शेवटी प्रेक्षक माझ्यात त्यांना शोधणार होते, त्यांची शैली पाहाणार होते. त्यामुळे त्या देहबोलीतून त्यांची शैली मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे हे मुख्य आव्हान होते. यासाठी विख्यात क्रिकेटपटू बलविंदर सिंधू यांनी वर्षभर आम्हाला प्रशिक्षण दिले,’’ अशी माहिती आदिनाथने दिली.
वेंगसरकरांविषयी आदिनाथचे निरीक्षण आणि अभ्यास पक्का होता हे त्याच्याशी बोलताना स्पष्ट होते. गप्पांच्या ओघात त्याने दिलीप वेंगसरकरांबद्दलचे चांगले निरीक्षण मांडले. ‘‘ त्यांची भूमिका साकारताना अजून एक आव्हान होते ते म्हणजे ग्रीप. वेंगसरकरांची ग्रीप (पकड) सोप्पी नाही. मला त्यांनी अशी एक आठवण सांगितली होती की, त्यांना कोणीतरी एक प्रशिक्षक भेटला होता, ज्याने त्यांची ग्रीप बिघडवून ठेवली होती. तेव्हा त्यांना प्रत्येक मॅचमध्ये ग्रीप सांभाळणे कठीण जात असे. कुठला गोलंदाज चेंडू फेकताना त्याला मारायच्या आधी ते बॅट बऱ्याचदा जमिनीवर थोपटायचे. तरीही त्यांची फलंदाजी अत्यंत दर्जेदार असायची. त्यांचे कव्हर ड्राइव्ह, पुल शॉट्स आणि स्क्वेवर कट खूप लोकप्रिय आहेत. त्यामुळे हे सर्वच आत्मसात करणं, अंगीकारणं खूप आव्हानात्मक होतं. त्या सरावातून, प्रशिक्षणातून ती शैली इतकी रुजवायची होती की भूमिका साकारताना स्वाभाविकरीत्या ती शैली पडद्यावर दिसणं गरजेचे होतं अन्यथा ते कृत्रिम वाटलं असतं. म्हणजे झोपेतसुद्धा त्यांच्यासारखी फलंदाजी करता येईल अशाप्रकारचं कडक प्रशिक्षण आम्हाला देण्यात आलं होतं,’’ असं तो सांगतो. आदिनाथला वेंगसरकर यांची शिस्त भावली, असंही त्याने आवर्जून सांगितलं. ‘‘त्यांच्या खेळात एक शिस्त आहे. मी त्यांना सतत भेटायचो. त्यांच्याकडून जितकं जाणून घेता येईल तितकं जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि तेही माझ्यासाठी वेळ द्यायचे. माझ्या पिढीतल्या मुलाला या दिग्गज व्यक्तीशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधायला मिळणं हीच खूप मोठी गोष्ट आहे,’’ असं आदिनाथ सांगतो.
आदिनाथ कोठारे हे नाव सध्या तरुणाईत लोकप्रिय ठरलं आहे. ‘माझा छकुला’पासून ते ‘अवताराची गोष्ट’, ‘झपाटलेला २’, ‘सतरंगी रे’, ‘१५ ऑगस्ट’,‘अनवट’, ‘दुभंग’, ‘नीलकंठ मास्तर’, ‘सिटी ऑफ ड्रीम्स २’ आणि अगदी ‘पानी’ या चित्रपटाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार या सगळ्यांमधून आदिनाथने वेगळी ओळख निर्माण केली आहे. मला भूमिका नाही तर कथा महत्त्वाची वाटते. मला चांगल्या कथेचा भाग व्हायला आवडतं आणि तो माझा हावरटपणा आहे, असं आदिनाथ आनंदाने सांगतो.
बलविंदर संधू म्हणाले, ‘‘क्या बात हैं, तुमने कव्हर ड्राइव्ह में बाऊंड्री मारी यार…’’
आमची टीम चित्रीकरण संपवून आयपीएलही खेळू शकली असती, असं गमतीने म्हणणाऱ्या आदिनाथने दिलीप वेंगसरकर यांची शैली आपल्यात जेव्हा भिनली तेव्हा त्याचा प्रत्यक्ष पुरावा खुद्द बलविंदर संधू यांनी पाहिला आणि आपल्याला दाद दिल्याचा किस्सा सांगितला. ‘‘आम्हाला प्रशिक्षणादरम्यान दुखापतीही झाल्या. मला टेनिस एलबो झाला, परंतु त्या जोशापुढे या इजा काहीच नव्हत्या. आम्ही प्रशिक्षण संपल्यावर हिमाचलमध्ये बुट कॅम्पला गेलो होतो तेव्हा सहजच आम्ही आमच्या टीम्समध्ये दोन गट पाडले आणि क्रिकेट मॅच रंगवली तेही टॅनिस बॉलसोबत. मी, रणवीर आणि इतर एका टीममध्ये होतो. तेव्हा मी अक्षरक्ष: दिलीप सरांच्या शैलीतला खाटकन कव्हर ड्राइव्ह मारला. बाऊंड्रीसह… तेही टॅनिस बॉलमध्ये… त्याक्षणी बलविंदर संधू म्हणाले, ‘‘आदी…क्या बात है, तुमने कव्हर ड्राईव्ह में बाऊंड्री मारी यार’’.
पूर्ण स्पष्टता असलेला दिग्दर्शक
‘‘दिग्दर्शक कबीर खान यांच्यासोबत काम करणं हेच खूप शिकण्यासारखं आहे. मला जेव्हा या भूमिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा मी कबीर सरांना भेटायला गेलो होतो. तेव्हा ते साधेसरळ, मुक्त स्वभावाचे वाटले. अगदी मित्राप्रमाणे वागत होते. त्यांनीच मला ही कथा सांगितली आणि पात्राबद्दल सांगितले. आम्हा कलाकारांना त्यांनी खूपच छान सांभाळून घेतले. आमच्या काही सूचनाही ते ऐकून घ्यायचे. त्याहीपलीकडे नको हे असंच राहू दे म्हणत त्यामागील कारणंही सांगायचे. एक खरं की त्यांना पुरेपुर कल्पना होती त्यांना या चित्रपटातून काय हवं आहे. कबीर खान, रणवीर सिंग या सगळ्यांबरोबर काम करण्याचा अनुभव विलक्षण होता,’’ असं आदिनाथ म्हणाला.
‘८३’च्या निमित्ताने शारीरिक आणि मानसिक आव्हानांचाही सामना करावा लागला, पण एक कलाकार म्हणून आव्हाने पेलत सफलता जिद्दीने प्राप्त करणं हेच ध्येय असतं. अभिनेत्याने एकाच वेळी तत्त्वज्ञानी आणि खेळाडूप्रमाणे असावं लागतं हा विचार मी मनात पक्का ठेवला होता.
आदिनाथ कोठारे, अभिनेता