अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. आत्ताही तिची चर्चा आहे तिने पुष्पा या दाक्षिणात्य चित्रपटाविषयी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे. पुष्पा चित्रपट आणि त्या अनुषंगाने बॉलिवूडवर केलेल्या भाष्यामुळे तिची सध्या चर्चा सुरू आहे. दाक्षिणात्य चित्रपट बॉलीवूडच्या तुलनेत अधिक का गाजत आहेत याबद्दल ती बोलली आहे. बॉलीवूडचा दर्जा का घसरत आहे याविषयीची कारणं तिने सांगितली आहेत. कंगना रणौतने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आपली मतं व्यक्त केली आहेत. या स्टोरीमध्ये तिने पुष्पा आणि KGF 2 या दोन चित्रपटांच्या फोटोचं कोलाज केलं आहे. तिने कलाकारांचं कौतुक केलं असून दाक्षिणात्य चित्रपट इतके लोकप्रिय का याचं कारणही सांगितलं आहे. कंगना म्हणते, दाक्षिणात्य चित्रपट निर्माते भारतीय सभ्यता, संस्कृतीशी जोडलेले असतात. दुसरी गोष्ट म्हणजे ते आपल्या कुटुंबावर फार प्रेम करतात आणि ते पारंपरिक आहेत, पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली नाहीत आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते आपल्या कामाप्रती एकनिष्ठ आहेत, त्यांचा प्रोफेशनलिजम आणि काम करण्याची इच्छाशक्ती वाखाणण्याजोगी आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीच्या वाढत्या लोकप्रियतेची कारणं सांगितल्यानंतर कंगना म्हणते, त्यामुळे त्यांनी बॉलिवूडमुळे आपण भ्रष्ट होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.