साठ-सत्तरच्या दशकांत मराठी रंगभूमीवर बालनाटय़ चळवळ ऐन भरात होती. रत्नाकर मतकरी, सुलभा देशपांडे, सुधा करमरकर या मंडळींनी जाणीवपूर्वक लहान मुलांच्या विश्वात डोकावणारी, त्यांच्या उपजत कल्पकतेला चालना देणारी, त्यांचं उत्तम रंजन करणारी बालनाटय़ं रंगभूमीवर आणली. या बालनाटय़ांनी कलावंतांच्या दोन-तीन पिढय़ा तर घडवल्याच; शिवाय मुलांना नाटकाची आवडही लावली; ज्याचं फलित म्हणजे पुढे मुख्य धारा रंगभूमीच्या सुजाण प्रेक्षकांची जडणघडण झाली. मुलांना अद्भुतरम्य गोष्टी आवडतात. त्याला खतपाणी घालणारी; त्याचवेळी त्यांच्यावर मूल्यसंस्कार करणारी ही बालनाटय़ं असत. ग्रिप्स थिएटर हेसुद्धा हेच काम करतं. परंतु त्यात मुलांना वास्तवाची जाणीव करून देण्याची निकड अधिक असते. मुलांना त्यांच्या भोवताली घडणाऱ्या घटनांबद्दल आणि त्या अनुषंगाने त्यांना पडणाऱ्या प्रश्नांबद्दल, त्यांच्या अंतर्मनात चालणाऱ्या द्वंद्वाबद्दल त्यांतून भाष्य असतं.. मार्गदर्शन केलेलं असतं. वाढत्या वयात मुलांना पडणाऱ्या अनेक प्रश्नांचा ऊहापोह त्यांतून असतो. त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न असतो. या दोन प्रकारच्या नाटकांत काही मूलभूत फरक आहेत. पहिल्यात मुलांच्या भूमिका सहसा मुलंच करतात, तर ग्रिप्स थिएटरमध्ये मुलांच्या भूमिकाही प्रौढ कलावंतच साकारतात. या नाटकांतून मांडलेले प्रश्न मुलांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या समजुतीतूनच सोडवण्याचा प्रयत्न असतो. या दोन्ही प्रकारच्या नाटकांतून मुलांचं मनोरंजन होतंच; पण ग्रिप्सच्या नाटकांतून त्यांना भोवतालचं जग समजून घेण्याची समज येते. त्यांचं आकलन वाढतं. ज्याचा उपयोग त्यांना पुढे जीवनातील अनेक समस्यांशी सामना करताना, त्या समजून घेताना होतो. पहिल्या प्रकारच्या बालनाटय़ांतून मुलांच्या कल्पकतेला प्रेरित करण्याची शक्ती अधिक असते. त्यांच्यातील सर्जनशीलतेचा विकास त्यातून होतो. ग्रिप्सच्या नाटकांमध्ये मुलांच्या कल्पनाशक्तीला फारसं स्थान नसतं, तर जीवन समजून देण्याघेण्याची प्रेरणा त्यात केंद्रस्थानी असते. या दोन्ही प्रकारच्या बालनाटय़ांतून मुलांची जडणघडण, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास उत्तमरीत्या होतो. यास्तव मुलांच्या घडणीच्या काळात त्यांना आवर्जून बालनाटय़ं दाखवण्याची निकड असते. अर्थात काळानुरूप बालनाटय़ं बदलायला हवी, हेही खरंच. विशेषत: सध्याच्या माहिती विस्फोटाच्या युगात तर ती तांत्रिकदृष्टय़ाही प्रगत न होती तरच आश्चर्य. असं जरी असलं तरी आज बालरंगभूमीवरील परिस्थिती अशी आहे, की ती डोरेमॉन, पोकेमॉन, सुपरमॅन, सिन्चॅन या पात्रांमध्येच गुरफटली आहे. या बालनाटय़ांतून उथळ करमणुकीखेरीज मुलांना काहीच मिळत नाही. या बालनाटय़ांचा दर्जाही सुमारच असतो. आशयाचा तर पत्ताच नसतो त्यात. अशा थिल्लर बालनाटय़ांनी मुलांच्या कल्पकतेला ना उत्तेजना मिळत, ना इंटरनेट- मोबाइलसारख्या आभासी विश्वातून ती बाहेर येत. जगण्याबद्दलचं त्यांचं आकलन वाढण्याचा तर प्रश्नच नाही. त्यामुळे अलीकडचे पालक अशी बालनाटय़ं मुलांना दाखवण्यापेक्षा ती न दाखवलेलीच बरी म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु या सगळ्याचे गंभीर, दूरगामी परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर होत असतात, हे कुणाच्या लक्षात येत नाही. आजची पिढी स्मार्ट आहे यात शंका नाही. परंतु तिच्यातल्या सर्जनशीलतेला, प्रतिभेला योग्य वळण लावण्यासाठी त्यांच्या ठायी करुणा, सहिष्णुता आणि इतरांप्रती उदारता असावी लागते त्याची वानवा प्रकर्षांनं जाणवते. प्रज्ञेला करुणेची जोड नसेल तर ती हिटलरी प्रवृत्ती जन्माला घालते. आजच्या मुलांच्या बाबतीत ही आशंका पालकपिढीला सतत भेडसावताना दिसते. मुलांच्या सर्वागीण वाढीसाठी पालक त्यांना विविध कलांचं प्रशिक्षण द्यायचा प्रयत्न करतात खरे; परंतु आपलं मूल ‘माणूस’ म्हणून घडवण्याची प्रक्रिया मात्र त्यांच्याकडून दुर्लक्षिली जाते. याकामी बालरंगभूमी महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु उत्तम बालनाटय़ंच येत नसल्यानं पालकांचाही नाइलाज होतो. तथापि असं एखादं उत्तम बालनाटय़ आल्यास त्याचं भरभरून स्वागत करायला ते उत्सुक असतात. याचं प्रत्यंतर अद्वैत थिएटर निर्मित, झी प्रस्तुत ‘अलबत्या गलबत्या’ या रत्नाकर मतकरीलिखित आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित नाटकाला होणाऱ्या आबालवृद्धांच्या गर्दीतून येतं. (योगायोगाची गोष्ट : नुकताच मतकरींना बालसाहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.)

‘अलबत्या गलबत्या’ हे सत्तरच्या दशकात गाजलेलं बालनाटय़. दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली यातली चेटकीण आजही जुन्या प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आज ही भूमिका मराठी रंगभूमीवरील एक चतुरस्र अभिनेते वैभव मांगले यात साकारत आहेत. विक्षिप्त राजा, त्याचे तसेच चक्रम सेनापती आणि प्रधानजी, ज्योतिषाने राजकन्येचा विवाह अलबत्या गलबत्या नामक एका सामान्य माणसाशी होईल अशी वर्तवलेली भविष्यवाणी, त्याचं हे भाकित खोटं ठरवण्यासाठी राजानं राजकन्येलाच नजरकैदेत टाकणं, अलबत्या गलबत्या या फाटक्या माणसाची जंगलात चेटकीणीशी गाठ पडणं आणि तिनं एका गुहेतून जादूची काडेपेटी आणून देण्याच्या बदल्यात अलबत्याला भरपूर हिरेमाणके, जडजवाहिर देण्याची दिलेली ऑफर, जादूची काडेपेटी मिळवण्यातल्या अडचणी, चेटकिणीची दुष्ट कारस्थानं, अलबत्याची राजकन्येशी भेट, चेटकिणीच्या कारवायांवर अलबत्यानं त्याच्या सवंगडय़ांच्या मदतीनं केलेली मात.. वगैरे होत शेवटी राजकन्या आणि अलबत्याचं ‘शुभमंगल’ होतं.. अशी छानपैकी मुलांना आवडेलशी ‘अलबत्या’ची गोष्ट!!

Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
pm modi launches infrastructure projects in tamil nadu
मोदींच्या हस्ते तामिळनाडूत १७,३०० कोटींच्या नव्या प्रकल्पांचे भूमिपूजन; काँग्रेस आणि द्रमुकवर टीकास्त्र
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?
badlapur railway station home platform marathi news, home platform inauguration by raosaheb danve marathi news
बदलापुरच्या होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण, सोहळ्यापूर्वी महाविकास आघाडीची निदर्शने

करकरीत वास्तवाशी नको त्या वयात सामोरं जाणाऱ्या आजच्या मुलांना अद्भुतरम्यता म्हणजे काय, हे जाणून घेण्यासाठी ‘हॅरी पॉटर’चा आश्रय घ्यावा लागतो. परंतु आपल्याकडेही त्या तोडीचं बालसाहित्य, बालनाटय़ं आहेत हे कळण्याकरता ‘अलबत्या गलबत्या’सारखं एखादं बालनाटय़ येण्याची कधी नव्हे इतकी निकड होती. ती या नाटकानं पूर्ण केली. चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित या प्रयोगात मुलांच्या भावविश्वातलं निरागसपण, अद्भुत गोष्टींबद्दल त्यांना वाटणारं आकर्षण, त्यांच्या कल्पनाशक्तीला आवाहन करण्याची प्रेरणा या सगळ्याचा विचार झाल्याचं जाणवतं. त्याला तांत्रिकतेची उत्तम जोड मिळाल्यानं नाटक अधिक रंगतदार झालं आहे. खूप दिवसांनी मुलांसह मोठय़ांनाही खिळवून ठेवणारं एक बालनाटय़ रंगभूमीवर आलं आहे. मोठय़ांच्या अंतर्मनात दडलेलं मूलपणही ‘अलबत्या गलबत्या’ पाहताना उसळून बाहेर येतं, हा प्रत्ययही या प्रयोगावेळी येतो. (अनेक मुलं व त्यांचे पालक मध्यांतरात थिएटरचा पडदा बाजूला सारून यातली चेटकीण पाहू बघतात.) पात्रनिवडीतच दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी अर्धी बाजी मारली आहे. प्रत्येक पात्राला त्याचं असं ‘व्यक्तिमत्त्व’ देण्यात ते यशस्वी झाले आहेत. अगदी कुत्री, मांजरं, उंदरालादेखील! ‘अलबत्या’च्या संवादांत एक अंगभूत लय अन् नाद आहे. तो अचूक हेरून त्यानुरूप नाटकाची हाताळणी केल्यानं नाटक हसतं-खेळतं, गातं-नाचतं झालं आहे. नाटकाचं संगीत, प्रकाशयोजना, नेपथ्य यांत एक प्रसन्न ताजेपण, रंगसंगतीतला तजेलदारपणा असल्यानं ते सर्वाना खिळवून ठेवतं. संगीतकार मयुरेश माडगांवकर यांनी जुन्या लोकगीताची धून शीर्षकगीतासाठी योजली आहे. ती नाटकाचा मूड प्रारंभीच निश्चित करते. कुंदन आहिरे यांचं नृत्यदिग्दर्शन जोशीलं आहे. ‘अलबत्या’च्या नेपथ्यातील विविध स्थळं त्यातल्या ब्राइट रंगसंगतीमुळे आणि अद्भुतरम्यतेमुळं प्रेक्षणीय झाली आहेत. नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांची कल्पकता त्यातून दिसून येते. शीतल तळपदे यांनीही अद्भुततेची वीण प्रकाशयोजनेतून गहिरी होईल असं पाहिलं आहे. मुलांच्या अनघड सौंदर्यदृष्टीस त्याद्वारे खाद्य मिळतं. रंगभूषाकार उलेश खंदारे आणि वेशभूषाकार महेश शेरला यांचा ‘अलबत्या’च्या दृश्यात्मकतेत सिंहाचा वाटा आहे. चेटकीण, कुत्रे, मांजरं, उंदीर, अलबत्या, ज्योतिषी, राजकन्या, अर्कचित्रात्मक राजा, प्रधानजी व सेनापती यांच्या अस्सल रूपाचं श्रेय रंगभूषा व वेशभूषाकारांना जातं.

वैभव मांगले या चतुरस्र अभिनेत्याची गेल्या काही काळातली नाटकांची निवड आपण ‘लंबी रेस का घोडा’ कसे आहोत, हे सिद्ध करणारी आहे. ‘वाडा नाटय़त्रयी’नंतर थेट बालनाटय़ात महत्त्वाची भूमिका स्वीकारण्यातली त्यांची चतुराई दाद देण्याजोगीच. दिलीप प्रभावळकरांची चेटकिणीवरचा रबरस्टॅम्प विसरायला लावण्याची किमया त्यांना यात साधली आहे. ‘कित्ती गं बाई मी हुशार..’ हे तिचं पालुपद त्यांनी आजच्या ‘स्मार्ट’ मुलांच्या गळी उतरवलं यातच सगळं आलं. प्रेक्षकांचं भान ते कधीच विसरत नाहीत. म्हणूनच अधूनमधून ते प्रेक्षकांना आपल्या ‘लीलां’मध्ये सहभागी करून घेण्याकरता क्षणक भूमिकेबाहेर येण्याची युगतही योजतात. सनीभूषण मुणगेकरने आजच्या ‘स्मार्ट’ पिढीचं प्रतिनिधित्व करणारा अलबत्या तसाच स्मार्टपणे वठवला आहे. दिलीप कराड (सेनापती व कुत्रा १), कुणाल धुमाळ (राजा व कुत्रा २) आणि बाळकृष्ण वानखेडे (प्रधानजी व कुत्रा ३) यांनी आपल्या दुहेरी भूमिकांना उत्तम प्रकारे न्याय दिला आहे. दोन भूमिकांत त्यांनी किंचितही गल्लत केलेली नाही. दीपक बाबाजी कदम यांचा ज्योतिषी व पोटभरे खाणावळवाला फर्मास. संदीप रेडकर (बोकोबा) आणि सायली बांधकर (भाटीबाई) यांची मांजरंही धमाल आणतात. सागर सातपुते उंदराची चपळता चोख दर्शवतो. श्रद्धा हांडेनी रंगवलेली राजकन्याही लोभस आहे.

एक उत्तम बालनाटय़ पाहिल्याचं समाधान ‘अलबत्या’ देतं. नि:संशय.