एखाद्या प्रसिद्ध चित्रपटाचा सीक्वल येणं ही गोष्ट बॉलिवूडला नवीन नाही. १९७८ च्या ‘पती पत्नी और वो’ आणि १९७५ च्या ‘चुपके चुपके’ या चित्रपटांची सीक्वेल निर्मिती चालू असतांना निर्माता भूषण कुमार आता २००७ सालच्या ‘भुलभुलैय्या’ या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल करणार असल्याचे समोर आले आहे. चित्रपट निर्माते यासाठी एका तरुण अभिनेत्याच्या शोधात आहेत. या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला विचारण्यात आले होते. पण, आता असे समोर आले की, अजून एका अभिनेत्याला चित्रपटनिर्मात्यांनी अक्षयच्या भूमिकेसाठी विचारले आहे.

पिंकव्हीलाच्या वृत्तानुसार, ‘आयुषमान खुरानाला या चित्रपटासाठी विचारले असून त्याने चित्रपटाच्या टीमची भेटही घेतली आहे. हा चित्रपट बिग बजेट असणार आहे. स्क्रिप्ट ऐकल्यानंतर आयुषमानला ती खूप आवडली आहे. त्यांची चर्चा सुरु असून आयुषमानने अजून कोणतेही उत्तर दिलेलं नाही. आयुषमानचा प्रमुख भूमिकेसाठी विचार सुरु आहे.’ या चित्रपटाचे शूटिंग २०१९ च्या शेवटी सुरु होईल असं सांगण्यात येतंय.

या चित्रपटात विद्या बालनची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार याविषयी अजून कोणतीही चर्चा झालेली नाही. अभिनेता ठरल्यानंतर अभिनेत्रीचा विचार करण्यात येईल. ही भूमिका आव्हानात्मक असल्याने एका कसदार अभिनेत्रीचाच निर्माते विचार करतील. असं सांगण्यात येतंय.

भूषण कुमार यांच्या ‘टी सीरिज’ या निर्मिती संस्थेने ‘भुलभुलैय्या २’ हे नाव नोंदवले आहे. प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेला ‘भुलभुलैय्या’ हा मुळात २००५चा तमिळ चित्रपट ‘चंद्रमुखी’चा रिमेक आहे. चंद्रमुखी हा चित्रपटदेखील १९९३ च्या ‘मणीचित्रथाझु’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. अक्षय कुमार, विद्या बालन आणि शाइनी अहुजा यांच्या अभिनयामुळे आणि चित्रपटातील गाण्यांमुळे ‘भुलभुलैय्या’ सुपरहिट ठरला होता.