दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूला उ आंटावा गाण्यामुळे घराघरांत ओळख मिळाली. त्याआधी ती दक्षिणेत सुपरहिट होतीच. तिच्या खासगी आयुष्याचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. सर्वात महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे नागा-चैतन्य आणि तिचा घटस्फोट. २०२१ मध्ये हे दोघंही वेगळे झाले. तिच्या खासगी आयुष्यातला हा निर्णय. ज्यानंतर समांथाला मायोसिटीस आजाराचंही निदान झालं. त्यामुळे तिने कामातूनही काही महिने ब्रेक घेतला होता. समांथा घटस्फोटाच्या वृत्तामुळे ट्रोल झाली होती. अजूनही तिला ट्रोल केलं जातं आहे.

समांथाने एक पॉडकास्ट सुरु केला आहे, जो आरोग्याशी संबंधित आहे. या पॉडकास्टच्या कमेंट बॉक्समध्ये एका युजरने तिला नागा चैतन्यसारख्या निरागस माणसाला का सोडून दिलंस? असा खोचक प्रश्न विचारला होता. त्यावर समांथाने रोखठोक उत्तर देत या युजरला खडे बोल सुनावले. समांथाचं हे उत्तर चर्चेत आहे.

नेमकं काय घडलं?

समांथा आरोग्याशी संबंधित तिच्या पॉडकास्टमध्ये मॉर्निंग रुटीनबाबत बोलत होती. ती सकाळी झोपेतून उठल्यापासून काय करते हे सांगत होती. हा पॉडकास्ट पूर्णपणे आरोग्याशी संबंधित आहे तरीही तिला एका युजरने प्रश्न विचारला, मला सांग तू तुझ्या निरागस पतीला का फसवलंस? असा प्रश्न युजरने केला. त्यावर समांथा म्हणाली, “माफ करा, या सवयी तुमच्या कामी येणार नाहीत. यापेक्षा जास्त चांगल्या उपायांची गरज तुम्हाला आहे. तुम्हाला शुभेच्छा.” समांथा आरोग्याच्या पॉडकास्टमध्ये योगाभ्यास आणि प्राणायम याबाबत बोलत होती. तोच संदर्भ देऊन तिने युजरचं तोंड गप्प केलं. समांथाने दिलेलं हे उत्तर चर्चेत आहे. Vishalkadam166 असं युजरनेम असलेल्या युजरला समांथाने खास तिच्या शब्दांत उत्तर दिलं आहे.

समांथाचं सडेतोड उत्तर चर्चेत

हे पण वाचा- ब्रेकनंतर समांथा रुथ प्रभू अ‍ॅटलीच्या चित्रपटातून करणार पुनरागमन; ‘हा’ सुपरस्टार असणार मुख्य भूमिकेत

नागा चैतन्या आणि समांथा २०१० पासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी साखरपुडा केला आणि त्याचवर्षी लग्नही केलं. मात्र त्यांचा संसार चार वर्षांपेक्षा जास्त काळ टिकला नाही. २ ऑक्टोबर २०२१ या दिवशी समांथाने विभक्त होण्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला होता.