राज्यातील बहुतेक मामलेदार कचेऱ्यांच्या इमारतीचे नूतनीकरण झाले आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळातील वातावरणाची अनुभूती येण्यासाठी अशी इमारत शोधण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. तसेच शासकीय मालकीच्या जुन्या वास्तू चित्रपटाच्या चित्रीकरणास देण्याकरिता परवानगी नसते. परंतु, महाराष्ट्र शासन व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची निर्मिती असलेल्या ‘यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची’ या चित्रपटासाठी शासनाकडून आवश्यक ते संपूर्ण सहकार्य मिळाले तसेच तीन कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाल्याचे या चित्रपटाचे ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी येथे सांगितले.
‘यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची’ हा चित्रपट १४ मार्चपासून संपूर्ण राज्यात प्रदर्शित होत आहे. या पाश्र्वभूमीवर, नाशिक येथे आलेल्या पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधून या चित्रपटाची निर्मिती प्रक्रियेतील वेगवेगळ्या अनुभवांची माहिती दिली. यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर सहा वर्षांनी त्यांचा जीवनपट बनविण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. परंतु, त्या वेळी हे कसे करता येईल हा प्रश्न आपणास पडला होता, असेही पटेल यांनी नमूद केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील विभूतींची त्यांच्या हयातीतच जीवनपट बनविण्याची संकल्पना मांडली होती. त्यानुसार एस. एम. जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे आदींचे माहितीपट बनविले. आता यशवंतराव चव्हाण यांच्या रोमहर्षक आयुष्याचा नाटय़मय प्रवास या चित्रपटाद्वारे साकारण्यात आला आहे. आधुनिक व पुरोगामी महाराष्ट्राच्या शिल्पकाराची ही कथा आहे. उत्कट देशाभिमान, प्रखर पुरोगामी विचार, नि:स्वार्थ लोकसेवा, स्वच्छ प्रशासन व निष्कलंक चरित्र यांच्या जोरावर कार्यक्षम लोकाभिमुख राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक देशभर नेणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वाने भारताची राजनीती, राजकीय चातुर्य जागतिक पातळीवर प्रस्थापित करणाऱ्या या नेत्याचा जीवनपट चार कलाकारांच्या मदतीने साकारण्यात आला आहे.
आजच्या पिढीला संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणजे नेमके काय हे माहीत नाही. चित्रपटात त्यावर प्रकाशझोत टाकून तो ज्वलंत काळ उभा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यशवंतराव यांच्या जीवनातील वेगवेगळे कंगोरे टिपण्यात आले. कलाकारांचा शोध घेण्यासोबत त्या काळातील वातावरणनिर्मिती करणे जिकिरीचे होते. शासनाकडून या चित्रपटासाठी बरेच सहकार्य लाभले. वास्तविक, शासकीय इमारती वा बंगले चित्रीकरणासाठी दिले जात नाहीत. असे असूनही या चित्रपटासाठी ते उपलब्ध करून देण्यात आले. आर्थिक मदतही देण्यात आल्याचे पटेल यांनी सांगितले. यशवंतरावांच्या वादळी आयुष्याचा पट केवळ अडीच-तीन तासांच्या मर्यादेत बसविणे हे मोठे आव्हान होते. ते ज्येष्ठ पत्रकार लेखक अरुण साधू यांनी पेलले. त्यांनी चित्रपटाचे पटकथा व संवादलेखन केले आहे. महाराष्ट्राचा हा लाडका नेता आपल्या अभिनयातून साकार करण्याची किमया अशोक लोखंडे यांनी साधली. वेणूताईंच्या भूमिकेत रंग भरले लुब्ना सलीम या समांतर रंगभूमीवरील अभिनेत्रीने. तसेच ओम भूतकर, वैशाली दाभाडे, मीना नाईक, रेखा कामत, सुप्रिया विनोद, सतीश आळेकर, राहुल सोलापूरकर, यशपाल सारनाथ यांच्या भूमिका आहेत.
‘आचारसंहिता व चित्रपटाचे प्रदर्शन हा योगायोग’
‘यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची’ चित्रपटाचे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण जयंतीचे औचित्य साधून आधीच जाहीर करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा आचारसंहितेशी कोणताही संबंध नाही. आचारसंहिता लागू झाल्यावर या चित्रपटाचे होणारे प्रदर्शन हा निव्वळ योगायोगाचा भाग असल्याचे दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Mar 2014 रोजी प्रकाशित
..वादळी आयुष्याचा जीवनपट!
राज्यातील बहुतेक मामलेदार कचेऱ्यांच्या इमारतीचे नूतनीकरण झाले आहे.

First published on: 11-03-2014 at 07:33 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitchat with yashwantrao chavan bakhar eka vadalachi movie director jabbar patel