शेवटी प्रेमाचाच विजय होतो, हे आपण सगळे ऐकून असलो, तरी हे प्रेम मिळवण्यासाठी मोठं अग्निदिव्य पार पाडावं लागतं हेही तितकंच खरं आहे. कठोर परीक्षा पास झाल्यावरच प्रेमाचा तुमच्या जीवनात गृहप्रवेश होतो. जीवनातल्या याच वास्तवाची, सत्याची प्रचिती देवयानीला उर्फ फुलराणीला (सिद्धी कारखानीस) सध्या येत आहे. कारण, एक्काच्या (विवेक सागळे) प्रेमासाठी आसुसलेल्या फुलराणीला सरतेशेवटी तिचं प्रेम मिळालं आहे.
आपल्या आयुष्यातून गेलेल्या देवयानीला विसरणं एक्कासाठी सोपं नसलं, तरी नव्याने आयुष्यात आलेल्या फुलराणीच्या प्रेमाने एक्काचं आयुष्य पुन्हा बहरून आलं आहे. हा एक्का जरी सुरेखाला (किशोरी आंबिये) आपली आई मानत असला, तरी सुरेखा मात्र एक्काबद्दल मनात रागच धरून असते. त्याला संपवण्यासाठीच तिने या फुलराणीला एक्काच्या आयुष्यात आणलं होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. नियतीला सुरेखाची ही चाल मंजूर नव्हती. म्हणूनच तर आजपर्यंत भरपूर संघर्ष केलेल्या, खूप काही सहन केलेल्या एक्काच्या आयुष्यात आता प्रेमाचा दरवळ पसरू लागला आहे.
एक्काला संपवण्यासाठी सुरेखा फुलराणीला आणते खरी, पण ही फुलराणी एक्काच्याच प्रेमात पडते. आपल्या प्रेमाने ती एक्काला आपलंसं करू पाहते. पण तिच्यासाठी हे अजिबातच सोपं नव्हतं. देवयानीच्या जागी एक्काच्या मनात आपलं स्थान निर्माण करताना फुलराणीला तारेवरची कसरत करावी लागली आहे. पण न हरता फुलराणीने ही अग्निपरीक्षा दिली आहे. जोपर्यंत एक्का स्वत:हून आपला स्वीकार करत नाही, तोपर्यंत त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालणार नाही, असा पण करणाऱ्या फुलराणीला सरतेशेवटी तिचं प्रेम मिळालं आहे. तिच्या प्रेमाने एक्काला जिंकून घेतलं आहे. म्हणूनच साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा सगळीकडेच आनंद पसरलेला आहे, तेव्हा फुलराणी आणि एक्काच्याही आयुष्यात आनंदाने, सुखाने गृहप्रवेश केला आहे.
गुढीपाडव्याच्या या शुभ मुहुर्तावर एक्का आणि फुलराणी दोघेही विवाहाच्या पवित्र बंधनात अडकत आहेत. फुलराणीच्या प्रेमाचा विजय झाला, असं यामुळे नक्कीच म्हणता येईल. लग्नानंतरचा गुढीपाडव्याचा आपला हा पहिलावहिला सण या दोघांनी एकत्ररित्या अगदी उत्साहात आणि आनंदात साजरा केला. हिंदू नववर्षाचा प्रारंभ असणाऱ्या या मुहुर्तावर दोघांच्याही आयुष्यात सुखाचा प्रवेश झालेला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
पण एक्का आणि फुलराणीचं प्रेमाची लग्नगाठ बांधून असं एकत्र येणं सुरेखाला कितपत रुचेल? ज्याचा शेवट करण्यासाठी सुरेखाने फुलराणीला आणलं, तीच मुलगी एक्काच्या आयुष्यात प्रेमाची राणी बनून राहिलेली सुरेखाला कितपत सहन होईल? सुरेखाला पूर्णपणे ओळखू लागलेली फुलराणी आपल्या प्रेमाच्या राजाला अर्थात एक्काला सुरेखापासून कसं वाचवणार? हे तुम्हाला पुढच्या भागांमध्ये पाहता येईल.
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2016 रोजी प्रकाशित
पाडव्याच्या मुहुर्तावर ‘देवयानी’ मध्ये प्रेमाचा गृहप्रवेश
एक्का आणि फुलराणी दोघेही विवाहाच्या पवित्र बंधनात अडकत आहेत.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 09-04-2016 at 12:55 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devyanis phulrani and ekka got married on gudi padwa