दोन राष्ट्रीय आणि पाच राज्य पुरस्कार मिळविलेला ‘ख्वाडा’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येवर ‘ख्वाडा’चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, सादरकर्ते चंद्रशेखर मोरे आणि चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या शशांक शेंडे, अनिल नगरकर, भाऊसाहेब शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयास भेट दिली आणि संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. त्या गप्पांचा वृत्तान्त..
‘ख्वाडा’ हा चित्रपट दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंचे स्वप्न होते. त्यामुळे या चित्रपटाच्या शीर्षकापासून, ते कलाकारांची निवड, चित्रपटांची मांडणी अशा अनेक गोष्टींमागे भाऊरावांचा काही एक विचार आहे हे जाणवल्याशिवाय राहात नाही. ‘ख्वाडा’ या चित्रपटाच्या शीर्षकापासूनच त्याची सुरुवात होते. ‘ख्वाडा’ म्हणजे काय?, यावर चित्रपटाचे शीर्षक लक्षवेधी असावे आणि त्या शीर्षकातून चित्रपटाचा संपूर्ण गाभा व्यक्त होणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन ‘ख्वाडा’ हे नाव चित्रपटाला दिल्याचे भाऊराव यांनी सांगितले. ‘ख्वाडा’ या शब्दाचे वेगवेगळे अर्थ असून मुख्य अर्थ ‘अडथळा’ असा आहे. अन्य अर्थ हे त्या त्या परिस्थितीनुसार समोर येतात, असे ते म्हणाले. या चित्रपटाचा विषय सतत ‘स्थलांतर’ करत राहणाऱ्या लोकांची गोष्ट सांगतो. भटकंती करणाऱ्या समाजाच्या जगण्याच्या संवेदना, त्यांची जीवनमूल्ये, जगण्याचा संघर्ष, मानवी प्रवृत्ती, मनगटशाहीच्या जोरावर करण्यात येणारी पिळवणूक याचा वेध या चित्रपटात घेण्यात आला असल्याची माहिती भाऊरावांनी दिली. एकीकडे इतर दिग्दर्शक शहरी विषयांच्या चित्रपटांकडे वळत असताना संपूर्णपणे ग्रामीण चित्रपट तोही पहिल्याच प्रयत्न करणे यात धोका नाही का वाटला?, या प्रश्नावर बोलताना चित्रपटाचा विषय संपूर्णपणे ग्रामीण आहे. पण, केवळ विषय ग्रामीण आहे म्हणून चित्रपट चालेल की नाही, असा धोका आपल्याला वाटले नसल्याचे भाऊराव यांचे म्हणणे आहे. मुळात, कोणताही चित्रपट करणे यात धोका हा असतोच. ग्रामीण भाषा, जीवन आणि विषय असलेले चित्रपट याआधीही येऊन गेले आहेत. त्यातून लोकांच्या वेगळ्या संवेदना, त्यांचे जगणे हे लोकांसमोर आले. वास्तवाचा वेध घेणारे आणि आपल्या दैनंदिन जीवनाला भिडणारे विषय चित्रपटांतून मांडले तर प्रेक्षकांचा त्याला प्रतिसाद मिळतो. मग तो चित्रपट ग्रामीण आहे की शहरी हा मुद्दा बाजूला राहतो, असा मुद्दा भाऊराव यांनी मांडला. शिवाय, जगण्याचा संघर्ष हा काही फक्त ग्रामीण भागांतील लोकांनाच करावा लागतो असे नाही, तर शहरी भागांतील लोकांनाही त्याचा अनुभव येत असतो. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थलांतरितांचा जो प्रश्न आहे त्याचाही संदर्भ भाऊराव यांनी यावेळी बोलताना दिला. संघर्षांचे प्रकार परिस्थितीनुरूप बदलतात हे लक्षात घेतले तर शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांना ‘ख्वाडा’ आवडेल, असे भाऊराव क ऱ्हाडेंनी सांगितले. कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपट असा भेद आपल्याला मान्य नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. चित्रपट ही एक कलाकृती असून चित्रपटाकडे कला म्हणून पाहिले जावे. कलात्मक आणि व्यावसायिक अशी दोन्ही टोके चुकीची असून चित्रपटातील आशय हा महत्त्वाचा असतो. तो आशय चित्रपटातून काय ताकदीने पुढे नेला जातो त्यावर चित्रपटाचे यश अवलंबून असते, असे भाऊराव यांनी सांगितले.
आशय आणि विषय पक्का असेल तर भाषेचा अडसर येत नाही
लंडन महोत्सवात ‘ख्वाडा’ दाखविला गेला. चित्रपट पाहून मुमताज नावाच्या बाई खूप प्रभावित झाल्या. त्यांना चित्रपट खूप आवडला. मुमताज या मूळच्या इराणच्या, पण गेली काही वर्षे त्या लंडनला स्थायिक झाल्या आहेत. चित्रपटातील ‘मायग्रेशन’चा मुद्दा त्यांना भावला असेल. हा चित्रपट म्हणजे ‘चित्रसंगती’ आहे. भाषेचा कोणताही अडसर न राहता चित्रपटातून भावना, विचार सगळ्यांपर्यंत पोहोचताहेत, हे या निमित्ताने आम्हाला जाणवले असल्याचे शशांक शेंडे म्हणाले.
थक्क करणारा चित्रपट
चित्रपट पूर्ण झाल्यानंतर मोठे नाव असलेल्या कंपनीने तो सादर करावा, असे वाटत होते. पण तसे काही झाले नाही. त्यामुळे मीच चित्रपट सादर करावा, असे मला सांगण्यात आले. मी चित्रपट पहिला. तो थक्क करणारा अनुभव होता. प्रेक्षकांनी ‘ख्वाडा’च्या पाठीशी उभे राहावे. चित्रपटाला ग्रामीण भागातील प्रेक्षकांबरोबरच शहरी प्रेक्षकही मिळेल.
चंद्रशेखर मोरे सादरकर्ते
‘ख्वाडा’ हा तर ‘चित्र’पट
‘ख्वाडा’ ची कथा ही पुणे व अहमदनगर जिल्ह्य़ांच्या ग्रामीण सीमेवर घडणारी आहे. ‘ख्वाडा’ संवादाच्या माध्यमातून पुढे जात नाही. तो ‘चित्र’पट आहे. चित्रसंगतीने तो पुढे जातो. शहरी संस्कृतीतून लोप पावलेल्या, लोप पावत जाणाऱ्या अनेक शब्दांचा यात वापर करण्यात आला आहे. मेंढपाळांच्या दैनंदिन जीवनातील हे सर्व शब्द आहेत.
शशांक शेंडे -अभिनेते
शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये
मी मूळचा शेतकरी कुटुंबातील. पण चित्रपटाकडे व्यवसाय म्हणून वळलो. शेती विकायचा निर्णय घेतला. कुटुंबीयांनी विरोध केला, पण त्यांना व्यावहारिकपणे सर्व पटवून दिले. मग घरचेही माझ्या पाठी उभे राहिले. शेतकऱ्यांच्या तरुण पिढीने नोकरी किंवा व्यवसायाकडे वळावे. मात्र कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नये
भाऊराव कऱ्हाडे -दिग्दर्शक
प्रेक्षकांना नक्की आवडेल
हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल. चित्रपटात मी ‘खलनायक’ आहे. मनगटशाहीच्या जोरावर ‘नडला की तोडला’ असा हिशेब असणारी ही व्यक्तिरेखा आहे. मी यापूर्वीही चित्रपटातून ‘खलनायक’ रंगविला आहे. सुमारे २५ चित्रपटांतून मी आत्तापर्यंत लहान-मोठय़ा भूमिका केल्या आहेत.
अनिल नगरकर अभिनेता
‘ख्वाडा’ने खूप आनंद आणि प्रसिद्धी दिली
चित्रपटातील नायकाला कुस्तीची पाश्र्वभूमी असल्याचे दाखविले आहे. मलाही कुस्तीची पाश्र्वभूमी होती. ही व्यक्तिरेखा मला आवडली होती. सुदैवाने मला ती साकारायला मिळाली, याचा आनंद आहे.अर्थात मला स्वत:लाही खूप प्रसिद्धी मिळाली. लोक ओळखायला लागले.
भाऊसाहेब शिंदे – अभिनेता