रितेश देशमुखची निर्मिती असलेला ‘लई भारी हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच तगडी स्टारकास्ट आणि भक्कम तांत्रिक बाजू या कारणांमुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्याबाबतीत एक थक्क करणारा गोंधळाचा प्रकार आता उघडकीस आला आहे. अजय-अतुल या प्रसिद्ध जोडीने संगीत दिलेल्या ‘लई भारी  चित्रपटाची गाणी मराठीतील प्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूर याने लिहिली आहेत. रविवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ‘लई भारी’तील गाण्यांच्या ध्वनिफितीचे प्रकाशन करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमाचे आयोजक या संगीत प्रकाशन सोहळ्यासाठी चक्क गुरू ठाकूरलाच आमंत्रण देण्यास विसरले. विशेष म्हणजे, या संपूर्ण कार्यक्रमात ही गोष्ट कुणाच्याही लक्षात आली नाही. मात्र, गुरू ठाकूरने मंगळवारी या प्रकाराबद्दल फेसबूकवरून जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर आयोजकांपासून सगळ्यांचेच डोळे खाडकन उघडले. गुरूने फेसबूकवर एखाद्या सिनेमाच्या संगीत प्रकाशन सोहळ्याला गीतकारालाच बोलवायलाच विसरतात याहून लय भारी काय असू शकतं ? असा सवाल उपस्थित केला. यानंतर चित्रपटाचे निर्माते आणि संबंधितांनी दूरध्वनी करून झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मग, गुरू ठाकूरनेसुद्धा अशा तांत्रिक चुका घडत असल्याचे सांगत या प्रकरणावर पडदा टाकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lyricist not invited for music launch ceremony
First published on: 10-06-2014 at 11:37 IST