जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने विविध कलाकार याविषयी त्यांचे मत मांडत आहेत. मालिका, चित्रपट व नाटक यांसारख्या प्रभावी माध्यमातून 'एड्स' सारख्या गंभीर विषयावर जनजागृती होऊ शकते का? किंवा ती अधिकाधिक प्रमाणात होत आहे असे वाटते का ? हे या कलाकारांनी त्यांच्याच शब्दात स्पष्ट केले आहे. १ डिसेंबर, म्हणजेच जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी आणि विविध स्तरांवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पण, या सर्वच स्तरांतून सातत्त्याने समोर येणारी मागणी म्हणजे एड्सविषयीच्या जनजागृतिची आणि त्याबाबत खुलून बोलण्याची. शालेय अभ्यासक्रमात हा विषय असला पाहिजे - अशोक शिंदे, अभिनेता 'एड्स' या विकाराविषयी निश्चितच जनजागृतीची गरज आहे. ज्याप्रमाणे शालेय शिक्षणात सेक्स एज्युकेशन विषयी शिकवले जाते. त्याचप्रमाणे 'एड्स जनजागृती' हा विषय अभ्यासक्रमात असला पाहिजे. माननीय शिक्षणमंत्री विनोद तावडे हे माझे मित्र आहेत. मी त्यांना खासगीत भेटून या विषयी सल्ला देणार आहे. इतर विषयांप्रमाणेच आरोग्य हा विषयही महत्त्वाचा आहे. कलाकारांच्या दृष्टीकोनातून जर बोलायचे झाले तर, चित्रपट बघितलाच जातो असे नाही. पण ज्या मालिका सध्या गाजत आहेत त्यामध्ये हा विषय दाखवला गेला तरी खूप मोठा फरक पडू शकतो. मराठी, हिंदीमध्ये या विषयावर अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. हिंदीमध्ये 'फिर मिलेंगे' हा सलमान खान, शिल्पा शेट्टी आणि अभिषेक बच्चन यांच्यावर चित्रित केलेला चित्रपट २००४ साली येऊन गेला. मात्र सर्वानांच चित्रपट पहाता येतोच असे नाही. वृत्तपत्र किंवा वृत्त वाहिनी यांमध्येही हे विषय मांडले गेले पाहिजेत. मात्र शालेय अभ्यासक्रम हा सर्वात महत्त्वाचा उपाय आणि गरज आहे असे मला वाटते. तांत्रिक मर्यादांमुळे याविषयी मोकळेपणाने सांगता येत नाही - नम्रता गायकवाड, अभिनेत्री आपल्या भारतात खजुराहो सारखी शिल्पाकृती असुनही लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत आपण मागास आहोत. लैंगिकतेबद्दल उघडपणे न बोलणे हे सभ्यतेशी जोडल्यापासून त्याकडे वेगळ्या पध्दतीने बघितले जाते. त्याच कारणामुळे लैंगिक अजारांबाबत जागरूकता नाही. एड्स हा त्यापैकीच एक रोग आहे. आज एड्स दिनानिमित्त तरी त्या बद्दल योग्यपद्धतीने जागरूकता निर्माण झाली पाहिजे. एड्स या विषयावर जाहिरात, चित्रपट या माध्यमातून अनेकदा प्रकाश टाकण्यात आला पण त्यालाही तांत्रिक मर्यादा असल्याने मोकळेपणाने प्रत्येक गोष्ट उलगडून सांगता येत नाही. अशावेळी एड्सबद्दल लोकांमध्ये असणारे अज्ञान सगळ्यात आधी दूर केले गेले पाहिजे. एड्स होण्याची कारणे, तो नेमका कशामुळे होतो. तो होऊ नये म्हणून खबरदारीचे उपाय, वेळोवेळी रक्ताची तपासणी करणे अशा पद्धतीने प्रत्येक नागरीकाला त्याबद्दल खबरदारीचे उपाय नीट समजावून सांगितले पाहिजे. ह्या एड्स दिनानिमित्ताने हे सगळं करण्यात आपण यशस्वी झालो तरच भारतातून एड्स हद्दपार होईल.