‘आभास हा… आभास हा, छळतो तुला, छळतो मला… आभास हा…’ हे गाणं आजगायत मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. पिढी बदलत गेली, तरी हे गाणं मात्र अजूनही तितकंच तरुण आहे. ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटाला आज १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. केदार शिंदे दिग्दर्शित आणि रसिका जोशी लिखित ‘यंदा कर्तव्य आहे’ २००६ साली प्रदर्शित झाला होता. मनाविरुद्ध अचानक ठरलेलं लग्न अन् मग फुललेलं प्रेम या चित्रपटात पाहायला मिळालं. विशेष म्हणजे नवविवाहित जोडप्याला येणाऱ्या अडचणी या मजेशीररित्या चित्रपटात हाताळण्यात आल्या आहेत.

अंकुश चौधरी व स्मिता शेवाळे अभिनीत ‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपटाला प्रदर्शनानंतर तितकासा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. पण त्यानंतरच्या काळात जेव्हा हा चित्रपट टेलिव्हिजनवर आला तेव्हा ‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. चित्रपटातील गाणी देखील हिट झाली. शिवाय अंकुशने साकारलेला राहुल देसाई व स्मिताने साकारलेली स्वाती प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. ‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपटातील काही सीन्सना व गाण्यांना युट्यूबवर कोट्यवधींच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. आज ‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपटाला १८ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या स्मिता शेवाळे हिच्याशी मारलेल्या खास गप्पा.

‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपटामुळे मिळाली नवी ओळख

मला खरंच खूप छान वाटतंय, ‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपटाला १८ वर्ष पूर्ण झालीयेत. माझा हा पहिला चित्रपट. या चित्रपटातून मी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे हा चित्रपट रिलवर चित्रीत झाला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही लोक मला ‘आभास हा गर्ल’ म्हणतात. त्यामुळे माझ्या पहिल्याच चित्रपटाला १८ वर्ष पूर्ण झालीयेत हे खूप भारी वाटतंय. या चित्रपटाने मला खूप काही दिलं आहे. चित्रपटाने आणि विशेष म्हणजे ‘आभास या’ गाण्याने मला ओळख दिली. तेव्हापासून ते आजपर्यंत मी सिनेसृष्टीत अविरत काम करतेय. मधल्या करोना काळात मी फक्त काम केलं नव्हतं. पण त्यानंतर माझं सतत काम सुरू आहे.

गॉडफादर नसताना १९व्या वर्षी मिळाला चित्रपट

मी ‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपट करताना फक्त १९ वर्षांची होते. मला हा चित्रपट मिळाला तेव्हा सिनेसृष्टीत काम करायचं आहे की, नाही हे देखील माझं ठरलं नव्हतं. म्हणजे ते ठरवण्याआधीच मला ‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपट मिळाला. मी नशिबाने या क्षेत्रात आले. काहीजणी ठरवून येतात, मला मोठी अभिनेत्री व्हायचं आहे. पण माझं असं न ठरता मला कलाक्षेत्रात काहीतरी करायचं होतं हे शोधता शोधता मला या चित्रपटाची ऑफर मिळाली. तेव्हापासून मला जी कामं सिनेसृष्टीनं दिली अर्थात ती मी प्लॅन केली असती तर अजून करिअर छान असतं. पण कोणीही गॉडफादर नसताना या क्षेत्रात टिकून राहणं आणि १८ वर्ष सतत काम करणं ही मला खूप मोठी कामगिरी वाटते.

हेही वाचा – Video: ‘कन्यादान’ फेम अभिनेत्री लवकरच होणार पुण्याची सून; हातावर रेखाटले प्रेमाचे खास क्षण, पाहा सुंदर मेहंदी

स्मिताच्या वडिलांना नव्हता अजिबात विश्वास

‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपटाच्या मुहूर्ताला माझे आई-वडील १० मिनिटांसाठी आले होते आणि थेट ते चित्रपटाच्या प्रीमियरला आले होते. मी पहिलाच चित्रपट करतेय, मी १९ वर्षांची आहे, मला कोणताही अनुभव नाहीये त्यामुळे ते मला सतत नीट समजवायचे. कारण माझ्या आजूबाजूला कोणीही नव्हतं. केदार शिंदे व अंकुश चौधरी अशी आपली छान टीम आहे आणि त्या चित्रपटात आपल्याला काम करण्याची संधी मिळाली आहे. याचं दृष्टीकोनातून मी चित्रपट स्वीकारला होता. मला आठवतंय की, माझ्या बाबांना मी ‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपट करतेय, यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. जेव्हा मी त्यांना चित्रपटाच्या मुहूर्ताला घेऊन गेले तेव्हा त्यांना विश्वास बसला. प्रीमियरच्या वेळेला ते मंत्रमुग्ध झाले होते. त्यांच्याकडे बघून मला खूप छान वाटलं होतं. ‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपटाचा प्रीमियर प्लाझा चित्रपटगृहात झाला होता. तेव्हा मराठी सिनेसृष्टीतील सर्व कलाकार आले होते. सचिन पिळगांवकर, अशोक सराफ अशा अनेक दिग्गज मंडळींनी प्रीमियरला हजेरी लावली होती. ‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपटाचा प्रीमियर दणक्यात झाला होता.

चित्रपटामुळे रात्रोरात झाली नाही स्टार, पाच वर्ष होतं दडपण

पहिला चित्रपट केदार शिंदे व अंकुश चौधरींबरोबर करताना खूप दडपण आलं होतं. पण ते दडपण चित्रपटापुरतं राहिलं नाही. पुढे देखील ते दडपण मला होतंच. कारण चित्रपट मिळाला केला. पण आता पुढे काय? या चित्रपटानंतर पुढे कसं करायचं? हे दडपण राहिलं. आता केलंय ते बरोबर आहे का? कारण ‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपट मुरांब्यासारखा मुरत गेला. जेवढा तो जुना जुना होतं गेला, तेवढा तो लोकप्रिय होतं गेला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मला फारशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. आता अनेक वर्षांनंतर मला त्याचं यश उपभोगायला मिळतंय. कारण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन-तीन वर्ष मला दडपण होतं की, मी काम केलंय ते बरं केलंय का? हेच कळतं नव्हतं.

हेही वाचा – Video: “आपल्या आई-वडिलांशिवाय…”, चाहत्याने हातावर काढलेला टॅटू पाहून शिव ठाकरेची प्रतिक्रिया, म्हणाला…

मला काम मिळणार आहे का? हे म्हणेपर्यंत मला काम मिळत होतं. पण ते मिळालेलं काम खरंच मला जमतंय का? याचं दडपणात माझी तीन-चार वर्ष गेली. दडपण हे पुढे चार-पाच वर्ष कायमच होतं. पाच वर्षांनंतर या चित्रपटामुळे माझी एक ओळख निर्माण झाली, याचा प्रत्यय आला. ‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपट आल्यानंतर एका रात्रीत मी स्टार वगैरे झाले नव्हते. हा चित्रपटात ५० वेळा पाहणारे प्रेक्षक मला भेटले आहेत. तो एकदा चित्रपट बघितला आणि मी एका रात्रीत स्टार झाले, असं नाही झालं. तो चित्रपट प्रेक्षकांना सतत बघावासा वाटला आणि मग मी लोकांना आवडू लागले. चित्रपटात जी मी निरागस दाखवले होते, तशीच मी लोकांना वाटायचे. एवढंच नव्हे तर सिनेसृष्टीतील कलाकारांना देखील तशीच वाटतं होते. जेव्हा दुसऱ्या प्रकारच्या भूमिका केल्या, तेव्हा लोकांना पटलं की, अरे हिने खरंच चांगलं काम केलंय!

दरम्यान, ‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपटानंतर स्मिताने विविधांगी भूमिका साकारल्या. ‘चल लवकर’, ‘आलटून पालटून’, ‘मन्या सज्जना’, ‘लाडीगोडी’, ‘या गोलगोल डब्यातला’, ‘थँक्यू विठ्ठला’, ‘वन रुम किचन’, ‘सुभेदार’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिनं काम केलं. सध्या ती ‘मुरांबा’ मालिकेत पाहायला मिळत आहे. शिवाय स्मिता स्वतःच्या युट्यूब चॅनलवर दैनंदिन जीवनातल्या समस्या, विशेष म्हणजे स्त्रीयांच्या समस्या याविषयी व्हिडीओ करत असते.