समीर जावळे

Andhar Maya Review रात्रीचा किर्र काळोख, बाहेर समुद्राचा खळाळणारा आवाज, कोकणात्या नागमोडी रस्त्यावरुन येणारी एक गाडी.. अशी जबरदस्त सुरुवात असलेली आणि एका वाड्यापाशी येऊन थांबणारी, त्या वाड्यातली रहस्यं सांगणारी सीरिज म्हणजे नुकतीच झी ५ वर आलेली अंधार माया ही वेब सीरिज. रहस्य सांगणारी आणि किंवा भीती वाटावी अशी वेब सीरिज, चित्रपट हे कायमच चर्चेचा विषय ठरतात. अंधार मायाचीही चर्चा यामुळेच होते आहे. अंधार माया ही सात भागांची वेब सीरिज आहे. यातला प्रत्येक भाग उत्कंठा वाढवणारा ठरलाय यात काहीही शंका नाही.

कथानक थोडक्यात काय?

दिनूशेठ नावाचा वाड्यात राहणारा एकजण वारला आहे. त्याच्या तेराव्यासाठी तीन भावडं, एक बहीण, त्यांच्या बायका येतात. एक भाऊ अविवाहित आहे. वाड्यात त्यांचं स्वागत करतो तो वाड्याची देखभाल करणारा गोण्या. पुढच्या तीन दिवसांत काय काय घडतं? खातू वाड्याचं रहस्य काय? हे सांगणारी ही सीरिज आहे.

अंधार मायाची निर्मिती एरिकॉनची

अंधार माया या सिरीज बद्दल बोलायचे झाल्यास लोकप्रिय अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत व तिचा नवरा तेजस देसाई यांनी त्यांच्या एरिकॉन या प्रोडक्शन अंतर्गत निर्मिती केली आहे. तर त्याचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते भीमराव मुडे यांनी केले आहे. या सिरीजचे कथा आणि संवाद रात्रीस खेळ चाले फेम प्रल्हाद कुरतडकर यांनी लिहिले आहेत. अभिनेते किशोर कदम या सिरीजच्या मध्यवर्ती भूमिकेत आहेत. किशोर कदम यांच्यासह या सीरिजमध्ये शुभंकर तावडे, ऋतुजा बागवे, ओम प्रकाश शिंदे, स्वप्नाली पाटील यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Andhar Maya Web Series
अंधार माया वेब सीरिजमधला एक सीन (फोटो-पीआर)

अभिनय आणि दिग्दर्शन कसं आहे?

‘गोण्या’ या पात्रात किशोर कदम यांनी जान ओतली आहे यात काही शंकाच नाही. गोण्याच्या स्वभावातल्या विविध छटा त्यांनी अत्यंत ताकदीने उभ्या केल्या आहेत. शिवाय कोकणी भाषेचा लहेजाही अगदी चपखल उचलला आहे. कोकणातल्या नागमोडी वाटेसारखीच तिथली भाषाही आहे. त्या भाषेला एक वेगळा गोडवा आहे प्रसंगी जरबही आहे. या सगळ्याचा उत्तम मिलाफ सौमित्र अर्थात किशोर कदम यांनी दाखवून दिला आहे. शुभंकर तावडे, ऋतुजा बागवे यांच्यासह सगळ्याच कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. त्यामुळे ही सीरिज प्रत्येक भागागणिक आपली उत्कंठा वाढवते. अंधार माया हे नाव त्यात दिसणारी पात्रं, खातू कुटुंब या सगळ्या गोष्टी आपली पकड घेतात. शिवाय भीती हा या सीरिजचा महत्त्वाचा गाभा आहे. दिग्दर्शक आणि निर्मात्यांना ही भीती भडक करुन किंवा आणखी भेसूर पद्धतीनेही दाखवता आली असती. पण ते टाळून शांतपणे काळजाचा ठाव घेण्याचं कसब यात दिग्दर्शकाने अगदी व्यवस्थित साधलं आहे. शिवाय यातले संवादही लक्षात राहण्यासारखे आहेत.

काळोखात दडलेली रहस्यं

खातूंच्या या वाड्यात काळोख आहे, वाडा समुद्राच्या किनारी असला तरीही तिथे येण्यासाठी जंगल पार करावं लागतं आहे. हा वाडा खातूंच्या कैक पिढ्या पाहात तिथे उभा आहे असं दाखवलं गेलं आहे. प्रत्येक भागात वाड्याच्या काळोखात दडलेली रहस्यं समोर येतात आणि आपण आवाक् होतो. अंधार माया हे नाव ही सीरिजला अगदी शोभलं आहे. जी. ए. कुलकर्णी यांची काजळ माया नावाची एक कादंबरी होती. त्यातही थरार होता, रहस्यं होती ती उलगडत जातात तशीही या वाड्यातलीही रहस्य उलगडतात. अंधार माया पाहताना आपण त्यात गुंतत जातो. भीमराव मुडे यांच्या दिग्दर्शनाचं हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटच्या भागातला ट्वीस्टही खास

एका मागोमाग एक सात भाग आपल्यावर भीतीचा एक परिणाम साधत असतात. प्रेक्षक म्हणून जेव्हा आपण सातव्या भागापर्यंत म्हणजेच सीरिजच्या शेवटापर्यंत येतो तेव्हा तो शेवट असा असेल याची पुसटशी कल्पनाही आपल्याला नसते. त्यामुळे खिळवून ठेवणारा हा थरार एकदा तरी पाहायलाच हवा यात शंका नाही. अंधार माया झी ५ वर ३० मे रोजी रिलिज झालेली वेब सीरिज आहे. कोकणातल्या वाड्याचा हा थरार अनुभवलाच पाहिजे यात शंका नाही.