झी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले.’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘रात्रीस खेळ चाले २’ने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले होते. आता लवकरच ‘रात्रीस खेळ चाले ३’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच झी वाहिनीनने या मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये आण्णा नाईक थेट मुंबई लोकलमध्येही पोहोचले असल्याचे पाहायला मिळते.

झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘रात्रीस खेळ चाले 3’चा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये मुंबई लोकलमधून रात्रीचा प्रवास करताना काही लोकं दाखवण्यात आली आहेत. ट्रेनच्या डब्यात बसलेल्या एका व्यक्तीचे लक्ष ‘अण्णा नाईक परत येणार.. अण्णा नाईक परत येणार’ असे लिहिलेल्या ठिकाणी जाते. त्यानंतर तेथे बसलेले सगळे जण अण्णांची खिल्ली उडवतात. तितक्यात अचानक खिडकीजवळ अण्णा येतात आणि ‘येणार म्हटलं तर यायलाच पाहिजे ना’ असे बोलताना दिसतात. त्यानंतर ते वाऱ्याच्या वेगाने गायब देखील होतात.

‘रात्रीस खेळ चाले ३’चा प्रोमो पाहता चाहत्यांमध्ये मालिकेबाबत उत्सुकता वाढली आहे. मालिका २२ मार्चपासून रात्री ११ वाजता झी मराठी या वाहिनीवर पाहता येणार आहे.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, दत्ता, माधव, पांडू, वच्छी या पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र, अण्णा नाईक या भूमिकेने तर सगळ्यांच्या मनात एक भीती निर्माण केली होती. आता या दोन्ही भागांतील पात्र ‘रात्रीस खेळ चाले ३’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये प्रॉपर्टीसाठी घरात सुरु असलेले राजकारण, खून प्रकरण हे सर्व काही दाखवण्यात आले होते. त्यानंतर ‘रात्रीस खेळ चाले २’मध्ये २० वर्षांपूर्वीची कहाणी दाखवण्यात आली होती. या भागातील अण्णा नाईक आणि शेवंताच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती. पण मालिकेच्या शेवटी शेवंता आणि अण्णा यांचा मृत्यू होतो. त्यामुळे आता ‘रात्रीस खेळ चाले ३’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार यासाठी चाहते उत्सुक आहेत.