‘जाओ पहले उसकी साईन लेके आओ जिसने मेरे हाथ पर ये लिखा’ हा संवाद असो की ‘अरे ओ सांभा कितने आदमी थे’ हा संवाद असो आपल्या अप्रतिम पटकथा व संवादलेखनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या सलीम-जावेद अर्थात सलीम खान-जावेद अख्तर या लेखकद्वयींची अजरामर कलाकृती असलेल्या ‘शोले’ चित्रपटाच्या थ्रीडी आवृत्तीच्या ‘फर्स्ट लूक’प्रसंगी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र व्यासपीठावर आली. बॉलिवूडमधला हा ऐतिहासिक क्षण ठरला कारण पूर्वीचे हे घनिष्ट मित्र गेल्या अनेक वर्षांपासून ‘दूर’च होते.
‘शोले’मधील वीरू, जय, ठाकूर, बसंती, सांभा किंवा गब्बर असो जवळपास प्रत्येक व्यक्तिरेखा अमर्त्य असल्याचे प्रतिपादन लेखकद्वयी सलीम-जावेद यांनी केले. शोले थ्रीडी सिनेमाच्या ‘फर्स्ट लूक’चे उद्घाटन आमच्या हस्ते करताना आम्ही स्मरणरंजनात रमून गेलो, असेही अख्तर-खान यांनी सांगितले. जावेद अख्तर यांनी असेही नमूद केले की शोले आम्ही द्वयींनी लिहिला असला तरी अप्रतिम कलाकृती आमच्या लिखाणात उतरली हे आमचे भाग्यच होय. शोले चित्रपट आमचा नाही तर आम्ही शोले चित्रपटाचे आहोत, असे अतिशय भावपूर्ण उद्गारही अख्तर यांनी याप्रसंगी काढले.
शोले चित्रपटाच्या लिखाणाच्या वेळची आठवण सांगताना सलीम खान म्हणाले की, पटकथा लेखनाचे काम करताना आम्हा दोघांमध्ये काही मतभेद व्हायचे. आमचे दृष्टिकोन वेगवेगळे असायचे. मग ते एकमेकांना आम्ही पटवून द्यायचो. विभिन्न मते, दृष्टीकोन असणे नेहमीच चांगले ठरते. त्यातूनच उत्तम पटकथा आमच्या हातून लिहून झाली, असेही खान यांनी नमूद केले. जवळपास ३२ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडांनंतर सलीम-जावेद ही जोडी लोकांसमोर आली आणि तोही दुर्मीळ योग शोले थ्रीडी चित्रपटामुळे घडून आला. तीन जानेवारी रोजी शोले थ्रीडी प्रदर्शित होत आहे.
लेखकद्वयी पुन्हा एकत्र व्यासपीठावर आली हा चांगला योगायोग जुळून आला असला तरी चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी हे मात्र फर्स्ट लूक सोहळ्यापासून लांब राहिले. वारंवार निमंत्रण देऊनही ते दूर राहिले. कारण सिप्पी बंधूंमध्ये वाद सुरू असून खटलाही सुरू होता. त्यामुळेच रमेश सिप्पी शोले थ्रीडी फर्स्ट लूक सोहळ्याला जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिले. कारण अन्य सिप्पी कुटूंबीय उपस्थित होते.