बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात शाहरुख खान जेव्हा दिल्लीहून आपलं करिअर करण्यासाठी मुंबई आला होता, तेव्हा त्याच्या खिशात निव्वळ ३०० रुपये होते आणि राहायला घरंही नव्हतं. आज हाच अभिनेता कोट्यवधी किंमत असलेल्या वांद्रे इथल्या ‘मन्नत’ बंगल्यात राहतो. आताच्या घडीला या बंगल्याची किंमत तब्बल २०० कोटी रुपये इतकी आहे. समुद्रकिनारी असलेल्या या बंगल्याची भुरळ एकेकाळी बॉलिवूडच्या ‘भाईजान’लाही पडली होती. शाहरुखचा ‘मन्नत’ बंगला मला विकत घ्यायचा होता, असा खुलासा सलमान खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.

वडील सलीम खान यांनी जर मला एक प्रश्न विचारला नसता तर आज ‘मन्नत’ हा बंगला माझा असता, असं सलमानने एका वेबसाइटवा दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. ‘एवढ्या मोठ्या घरात तू काय करशील?,’ असा प्रश्न सलमानच्या वडिलांनी त्याला विचारला होता. वडिलांचं ऐकून त्याने तो बंगला घेतला नाही. यावेळी ‘शाहरुखला मात्र तू एवढ्या मोठ्या घरात काय करतोस असा प्रश्न विचारायची इच्छा आहे,’ असं गमतीशीरपणे सलमान म्हणाला.

६००० चौरस फुटांच्या ‘मन्नत’ बंगल्यात बेडरूम, लिविंग एरिया, जीम, खासगी बार, लायब्ररी, मुलांसाठी प्लेरूम आहे. या बंगल्याचे इंटेरियर स्वतः शाहरुखची पत्नी गौरी खान हिने केलंय. आपल्या बंगल्याविषयी शाहरुख एका मुलाखतीत म्हणालेला की, ‘येस बॉस चित्रपटाच्या वेळीच ‘मन्नत’ विकत घेण्याची इच्छा माझ्या मनात आली होती. हा बंगला पाहताच क्षणी माझ्या मनात भरला होता. तेव्हा त्याला ‘विला विएना’ नावाने ओळखले जायचे.