‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते’, हे आपल्याला शाळेतच शिकविलं जातं. याच उक्तीला सार्थ ठरवत एकदा रिअ‍ॅलिटी शोच्या गणितात अपयशी ठरल्यावरही पुन्हा एका नव्या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून छोटय़ा पडद्यावर येण्याचा मोह सुपरस्टार शाहरुख खानला आवरता आला नाही. ‘झील’ समूहाच्या आगामी ‘अ‍ॅण्ड टीव्ही’ या नव्या वाहिनीवरील ‘इंडिया पूछेगा – सबसे शाना कौन?’ या रिअ‍ॅलिटी शोमधून शाहरुख पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
कित्येकदा आपल्याला सर्व काही ठाऊक आहे, असा आपला गैरसमज असतो. पण आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्वसामान्यांनी विचारलेल्या साध्या प्रश्नांची उत्तरेदेखील आपल्याकडे नसतात. अशाच देशभरातील सामान्य माणसांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन कोणता स्पर्धक स्वत:ला ‘शाना’ सिद्ध करेल याची तपासणी शाहरुख करणार आहे. या शोची मूळ संकल्पना इस्रायली शोवर आधारलेली असून यात प्रश्न विचारणारे आणि स्पर्धक दोन्ही सामान्य माणसंच असतील, असे शाहरुखने या नव्या वाहिनीच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. याआधीही शाहरुखने असाच एक प्रश्नमंजूषेवर आधारित शो केला होता. मात्र त्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच प्रकारचा शो करण्याचा अट्टहास कशासाठी, असे विचारल्यावर आपल्याला लोकांशी संवाद साधणं आवडतं, असं शाहरुखने सांगितलं. चित्रीकरणाच्या निमित्ताने आम्ही नेहमीच विविध लोकांना भेटतो-बोलतो; मात्र त्या गप्पांमागे चित्रपटांची पाश्र्वभूमी असते. ‘इंडिया पूछेगा – सबसे शाना कौन?’सारखे रिअ‍ॅलिटी शोज म्हणजे आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या सर्वसामान्यांशी संवाद साधण्याचे एक उत्तम माध्यम असल्याचं मत त्याने व्यक्त केलं. स्वत:च्या कारकिर्दीची सुरुवातच ‘फौजी’, ‘सर्कस’ अशा मालिकांमधून केलेल्या शाहरुखला पुन्हा एखाद्या मालिकेत काम करायला आवडेल का, असे विचारल्यावर आपल्याला ‘करमचंद’सारख्या एखाद्या रहस्यमयी रोमांचकारी मालिके त काम करायला आवडेल, असं शाहरुखने यानिमित्ताने बोलताना सांगितलं.