भारतीय अर्थव्यवस्थेला करोनाचा मोठा फटका बसला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (NSO) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीत एप्रिल ते जून २०२० या तिमाहीत तब्बल २३.९ टक्क्यांनी घट झाली आहे. सलग दोन तिमाहींमध्ये जीडीपीत घट आहे. दरम्यान भारताच्या या आर्थिक परिस्थितीवर अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कृपया या परिस्थितीसाठी आता देवाला जबाबदार धरु नका, असा टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

कंगना रणौतच्या लोकप्रियतेला उतरती कळा?; दिवसाला ५० हजार फॉलोअर्स करतायत अनफॉलो

“भारताचा GDP घसरल्याची बातमी ऐकली. ही खूपच निराशाजनक बातमी आहे. गेल्या ४० वर्षांतील ही सर्वात मोठी घसरण आहे. कृपा करुन या परिस्थितीसाठी देवाला जबाबदार धरु नका.” अशा आशयाचं ट्विट करुन शत्रूघ्न सिन्हा यांनी केंद्र सरकारवर उपरोधिक टोला लगावला आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

एकता कपूरची नागिन ठरली ‘खतरों के खिलाडी’ची विजेता; पटकावली ‘मेड ईन इंडिया’ ट्रॉफी

भारताच्या वास्तविक (रियल) जीडीपीमध्ये २६.९ लाख कोटींची घट झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही घट २३.९ टक्के इतकी आहे. नाममात्र (नॉमिनल) जीडीपी ३८.०८ लाखांनी घसरला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही घट २२.६ टक्के इतकी आहे. २२.८ टक्क्यांनी अर्थव्यवस्थेची सरासरी घसरण झाली आहे.

काय म्हणाल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन?

गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने राज्यांचे उत्पन्न घटले असून त्यांनी केंद्राकडे जीएसटीच्या नुकसानभरपाईचा धोशा लावला आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांची १.५ लाख कोटींची नुकसानभरपाई केंद्राने दिलेली नाही. राज्यांना दिल्या जाणाऱ्या जीएसटी नुकसानभरपाईचा प्रश्न सोडवण्यासाठी गुरुवारी सलग पाच तास जीएसटी परिषदेत चर्चा झाली. या बैठकीमध्ये सीतारामन यांनी देशावर आलेले करोना संकट हे ‘देवाची करणी’ (Act of God) असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असं म्हटलं. म्हणजेच देशातील आर्थिक परिस्थितीसाठी कोणालाही थेट जबाबदार धरता येणार नसून निसर्गनिर्मिती गोष्टींमुळे हे आर्थिक संकट ओढावल्याचे निर्मला यांना सुचित करायचं होतं.