समीर जावळे

एक काळ असा होता ज्या काळी सकाळी गजर लावण्यासाठी मोबाइल नव्हते तर रेडिओ होता. आकाशवाणीची साथ महत्त्वाची होतीच. मॅचची कॉमेंट्री असो किंवा हिंदी-मराठी गाणी असोत.. अगदी ‘ब्रेकिंग न्यूज’ही आकाशवाणी कळायच्या. हा काळ होता भारतात दूरदर्शन येण्यापूर्वीचा काळ. सध्याच्या आयपॉड, मोबाइल, एमपी ३ प्लेअरच्या काळात सीडीही संपल्या आणि कॅसेट्सही इतिहासजमा झाल्या. पण रेडिओ संपला नाही. त्याला चकचकीत रुप मिळालं… आणि नवी स्टेशन्सही. मात्र अमीन सयानींची ‘बिनाका गीतमाला’ आजही लोकांच्या स्मरणात आहे.

मनावर कोरल्या गेलेल्या आठवणी

रामानंद सागर यांचं ‘रामायण’ आणि बी. आर. चोप्रांचं ‘महाभारत’ ज्यांनी ज्यांनी पाहिलं आहे त्यांना राम म्हटलं की डोळ्यांसमोर अरुण गोविल येतो. कृष्ण म्हटलं की नितीश भारद्वाज. कारण ही पात्रं मनावर तशीच ठसली गेली आहेत किंवा कोरली गेली आहेत. तसंच ‘बिनाका गीतमाला’ म्हटलं की अमीन सयानी हे नाव आपोआप येतंच. “नमस्कार भाईयों और बहनो.. मै आपका दोस्त अमीन सयानी बोल रहा हूँ…” १९५२ ते १९८८ या ३६ वर्षांच्या कालावधीत अमीन सयानी नावाच्या माणसाने आकाशवाणी ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य केलंय. रेडिओवर अवलंबून असलेला एकही माणूस नसेल ज्याला ‘बिनाका गीतमाला’ आणि ‘अमीन सयानी’ माहीत नाहीत. माझ्याही घरात नॅशनल पॅनेसॉनिकचा रेडिओ होता त्यावर स्टेशन अॅडजेस्ट करुन बिनाका गीतमाला लागायची. ते स्वर अजूनही कानात आहेत… अगदी तसेच.

पहिलं प्रक्षेपण झालं आणि..

३ डिसेंबर १९५२ हाच तो दिवस होता ज्यादिवशी ‘बिनाका गीतमला’चं पहिलं प्रक्षेपण झालं होतं. या कार्यक्रमाला जेव्हा एक वर्ष झालं तेव्हा अमीन सयानींच्या ऑफिसमध्ये ६५ हजार पत्रं आली होती. या कार्यक्रमात सुरुवातीला ७ गाणी प्रक्षेपित केली जात असत ज्यांची संख्या नंतर १६ झाली होती. ‘बिनाका गीतमाले’ची सिग्नेचर ट्यूनही लोकांना तोपर्यंत पाठ झाली होती. ही ट्यून संगीतबद्ध केली होती ओ. पी. नय्यर यांनी. अमीन सयानी दिवसातले १२ तास काम करत असत. त्यांच्या मुलाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की “मला चांगलं आठवतंय रविवार असेल तरच माझी पापांशी (अमीन सयानी) भेट व्हायची. ते कायमच त्यांच्या स्टुडिओत काम करत असत. त्यांच्या मनात बुधवारी प्रसारित होणाऱ्या बिनाका गीतमालेत आपण काय वेगळं देऊ शकू? हाच विचार असायचा.”

पियूष मेहता काय म्हणाले होते?

गीतमालेच्या कार्यक्रमात त्यांच्यासह काम करणारे सहकारी पियूष मेहता यांनीही सांगितलं होतं की “अमीन सयानी यांच्या आवाजाची छाप लोकांच्या मनावर अधिराज्य करु लागली होती. कारण लोकांना अमीन सयानी हे फक्त निवेदक नाही तर त्यांचे मित्र वाटत. असाही काळ होता जेव्हा देशभरातले चाहते दर बुधवारी ६ वाजण्याची वाट बघत बसायचे.”

Iconic Voice of Geetmala on All India Radio Ameen Sayani Passes Away Marathi News
आयकॉनिक रेडिओ होस्ट अमीन सयानी यांचे ९१व्या वर्षी निधन (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

सुरुवातीची दोन दशकं बिनाका गीतमालेत नौशाद अली, सी. रामचंद्र, हेमंत कुमार, रोशन आणि मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी असत. नंतर या गाण्यांची जागा शंकर जयकिशन, ओ. पी. नय्यर, एस. डी. बर्मन यांच्या गाण्यांनी घेतली. तर लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी आणि आर.डी. बर्मन यांची गाणीही बिनाकाचा भाग झालीच.

तो अजरामर आणि सुमधुर आवाज

“भाईयों और बहनो मै आपका दोस्त अमीन सयानी बोल रहा हूँ.. ” असं म्हणत अमीन सयानी कार्यक्रमाची सुरुवात करत असत. त्यांचा शांत आणि सुमधुर आवाज श्रोत्यांच्या मनाला भिडत असे. रेडिओवर आपल्या आवडीचं गाणं ऐकण्यासाठी त्या काळात लोक पत्रांतून तशी शिफारस करत असत. ४२ वर्षे आमीन सयानी यांची बिनाका गीतमाला सुरु होती. हळूहळू यातला लोकांचा रस कमी होत गेला, मनोरंजनाची टीव्हीसारखी साधनं आली आणि त्यामुळे हा कार्यक्रम बंद करण्यात आला. मात्र अमीन सयानींच्या आवाजाचं गारुड कायम राहिलं. अनेकांनी त्यांची कॉपी करण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यांच्यासारखे तेच होते हे वारंवार अधोरेखित झालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा- Ameen Sayani Passes Away : रेडिओचा प्रसिद्ध आवाज हरपला, निवेदक अमीन सयानी यांचे निधन

प्रेक्षकांमुळेच माझी भाषा सुधारली

एका मुलाखतीत अमीन सयानींनी सांगितलं होतं, “माझ्या भाषेवर अनेक वादळांचे संस्कार आहेत. मी अशा घरात जन्माला आलो जिथे विविध भाषा बोलल्या जात होत्या. माझ्या वडिलांनी फारसी शिकली होती. तर माझी आई गुजराती, हिंदी आणि इंग्रजीत संवाद साधायची. मी लहानपणी गुजरातीत बोलत असे कारण माझी आई महात्मा गांधींची शिष्य होती. हिंदी आणि उर्दू भाषा बोलायची आहे हे जेव्हा समजलं तेव्हा मी काहीसा घाबरलो होतो. खूप विचार करुन मी स्वतःला या सगळ्यासाठी तयार केलं. हळूहळू प्रेक्षकांशी संवाद साधतानाच मी भाषा सुधारू शकलो.” असे हे अमीन सयानी नंतर रेडिओचे किंग झाले होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. मात्र आयुष्य समृद्ध करणारी भेट हा अवलिया आपल्याला न मागता देऊन गेलाय यात शंकाच नाही.