छोट्या पडद्यावरील सध्या सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत येणाऱ्या ट्वीस्टमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. गेल्या कित्येक आठवड्यांपासून या मालिकेने पहिल्या क्रमांकावर बाजी मारली आहे. सध्या या मालिकेत आईचं म्हणजेच अरुंधतीच्या दुसऱ्या लग्नाचा घाट घालण्यात आला आहे. त्यावरुन या मालिकेला ट्रोल केले जात आहे. नुकतंच अभिनेत्री मधुराणी प्रभूलकरने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधतीचे पात्र अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर साकारताना दिसत आहे. सध्या या मालिकेत आईचं म्हणजेच अरुंधतीचं लग्न दाखवलं जात आहे. अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न ठरल्यापासून दोघांच्या लग्नात काही ना काही विघ्न येत आहेत. नुकतंच अरुंधतीने इन्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच वाहिनीचे आभार मानले आहेत.

“अरुंधतीचं लग्न….

हे व्हावं की नाही… ? ह्या वयात लग्न करावं का…? केलं तर ते इतकं साजरं करावं का ? अशी विविध स्तरावर समाजात चर्चा झाली, होतेय. अनेकांना ह्यात आनंद होतोय तर काही जणांना मान्य होत नाहीये.
पण मला नक्की असं वाटतं की , कुणाही एकट्या व्यक्तीला कोणत्याही वयात आपल्याला आवडलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा अधिकार आहे. ते प्रौढ वयात होतंय, किंवा दुसरेपणाचं आहे म्हणून लपून छपून, साधेपणाने करावं असं का ? लग्न आहे ते… साजरं करावं.
हा इतका प्रागतिक विचार करणाऱ्या आमच्या वाहिनीचे स्टार प्रवाह चे आणि आमच्या प्रोजेक्ट हेड नमिता नाडकर्णीचे आणि दिग्दर्शक रवींद्र करमरकर ह्यांचे खरोखर धाडस आहे आणि अतिशय कौतुकास्पद आहे.”, अशी पोस्ट मधुराणी प्रभूलकरने केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मधुराणी प्रभूलकरच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. या पोस्टवर कमेंट करताना अनेकांनी “आम्ही सहमत आहोत, असे म्हटले आहे. तर एकाने खूप छान चालली आहे आई कुठे काय करते मालिका”, असे म्हटले आहे.