‘ठरलं तर मग’ या छोट्या पडद्यावरील मालिकेला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरीने ‘सायली’, तर अभिनेता अमित भानुशालीने ‘अर्जुन’ हे पात्र साकारले आहे. सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट लग्नाची कथा अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना सायलीची मंगळागौर पाहायला मिळणार आहे. मंगळागौरीच्या या खास भागामध्ये मालिकेत कोणता ट्विस्ट येणार? याबाबत अभिनेत्री जुई गडकरीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

हेही वाचा : “शिवजयंतीला भयावह गाणी…”, मृणाल कुलकर्णींनी केली महाराष्ट्रातील प्रेक्षकांना विनंती; म्हणाल्या, “पाच चित्रपटांनी मिळून…”

‘ठरलं तर मग’ मालिकेचं कथानक सध्या रंजक वळणावर पोहोचलं आहे. सायलीच्या आईची म्हणजेच ‘प्रतिमा’ या पात्राची एन्ट्री मालिकेत पुन्हा एकदा झाल्याने पुढे काय होणार? याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मीडियाशी संवाद साधताना जुईने मालिकेत येणाऱ्या ट्विस्टविषयी प्रेक्षकांना सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, “जे प्रेक्षक मालिका पाहतात त्यांना माहिती आहे की, सायली हीच खरी तन्वी आहे. आणि तिच्या पायावर पानाची जन्मखूण आहे. मंगळागौरीचे खेळ खेळताना साहजिकच पाय वगैरे वर होतो त्यामुळे ही जन्मखूण कोणाला तरी दिसणार आहे. त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला आगामी भागांमध्ये कळेल.”

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबला चाहत्यांकडून पाहिजेत ‘हे’ गिफ्ट्स; म्हणाली, “मुंबईत एक घर अन्…”

“सायलीच्या पायावरची जन्मखूण नेमकी कोणाला दिसणार हाच मुख्य ड्रामा असणार आहे. सायली मालिकेत नेहमीच गोंधळ, गडबड, धडपडत असते हे सर्वांना माहिती आहे. मंगळागौरीच्या कार्यक्रमात सुद्धा ती पडते आणि तिला कोण वाचवतं? या सगळ्या गोष्टी तुम्हाला येत्या भागात पाहायला मिळतील.” असं जुईने सांगितलं.

हेही वाचा : “चित्रपटगृहांकडे भीक मागावी लागते”, मराठमोळ्या अभिनेत्याने व्यक्त केली खंत; म्हणाला, “महाराष्ट्रात राहून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेला पहिल्या दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेत जुई गडकरी, अमित भानुशाली, प्राजक्ता दिघे, प्रियांका तेंडोलकर, मोनिका दाभाडे, सागर तलशीकर, शिल्पा नवलकर हे कलाकार मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.