बॉलिवूड क्वीन कंगना रणौत नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपलं मत मांडत असते. मागच्या काही दिवसांपासून ती सातत्यानं 'द काश्मीर फाइल्स'वर काही ना काही पोस्ट शेअर करताना दिसत आहे. या चित्रपटावर प्रतिक्रिया देत आहे. आता कंगनानं हा चित्रपट पाहिला असून तिनं यावर मीडियासमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. कंगनानं या व्हिडीओमध्ये पुन्हा एकदा बॉलिवूडकरांवर निशाणा साधला आहे. 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट पाहिल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना कंगना म्हणाली, 'खूपच उत्तम चित्रपट आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन. आज त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीची पापं धुवून टाकली. सगळ्या बॉलिवूडकरांची पापं धुतली गेली एवढा चांगला चित्रपट तयार केला. हा चित्रपट खरंच कौतुकास्पद आहे. त्यामुळे अजूनही जे कलाकार लपून बसले आहेत त्यांनी समोर येऊन चित्रपटाचं कौतुक करायला हवं, प्रमोशन करायला हवं. चांगल्या कथा नसलेल्या चित्रपटांना प्रमोट करता मग चांगली कथा असलेला चित्रपट कर नक्कीच प्रमोट करू शकता.' आणखी वाचा- “कपिल शर्माने नकार दिला…”, ‘द काश्मीर फाइल्स’ प्रमोशन वादावर अनुपम खेर यांचा व्हिडीओ चर्चेत दरम्यान याआधीही कंगनानं या चित्रपटाबाबात इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ‘द काश्मीर फाईल्स’साठी मिळालेले रेटिंग शेअर केले होते. त्यासोबत ती म्हणाली होती, “द काश्मीर फाईल्सबाबत सिनेसृष्टीत प्रचंड शांतता आहे. या शांततेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या चित्रपटाची कथा तसेच त्याची कमाई ही फारच उत्कृष्ट आहे. या चित्रपटाची गुंतवणूक आणि नफा ही भविष्यात एक केस स्टडी असू शकते. तसेच हा वर्षातील सर्वात यशस्वी आणि फायदेशीर चित्रपट ठरेल.” आणखी वाचा- “विवेक अग्निहोत्रीला याचे परिणाम भोगावे लागतील…”, ‘द काश्मीर फाइल्स’वर मनोज मुंतशिर यांचं ट्वीट चर्चेत “करोना महामारीनंतर चित्रपटगृहे ही फक्त बिग बजेट चित्रपटांसाठी किंवा फक्त व्हीएफएक्ससाठी उरली होती, अशी समज निर्माण झाली होती. पण या चित्रपटाने हे समज चुकीचे ठरवले. हा चित्रपट सर्व समज गैरसमज चुकीचे ठरवत प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटागृहाकडे आकर्षित करत आहे. अनेक चित्रपटगृहात सकाळी ६ चे शो ही हाऊसफुल्ल असल्याचे दिसत आहे. हे सर्व अविश्वसनीय आहे. Bullydawood आणि त्यांच्या चमच्यांना एक धक्काच बसला आहे. त्यांनी एक चकार शब्दही काढलेला नाही. आज संपूर्ण जग त्याच्याकडे पाहत आहे, पण तरीही त्यांनी एक शब्दही याबद्दल सांगितलेला नाही. त्यांची वेळ आता संपली आहे”, असेही कंगनानं सांगितलं होतं. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.