टेलिव्हिजनपासून सुरूवात करून दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपलं अस्तित्व निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सुशांत सिंग राजपूत. एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे तो घराघरांत पोहोचला. २०१३ मध्ये दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या ‘काय पो चे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि थोड्याच कालावधीत अभिनेता म्हणून त्याला चांगलंच यश मिळालं. मात्र आजही एक गोष्ट अशी आहे, ज्यामुळे आपण फसलोय अशी भावना तो व्यक्त करतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका मुलाखतीत सुशांतने म्हटलं की, ‘मला फसल्यासारखं वाटतंय. पैसा आणि प्रसिद्धी या गोष्टींमुळे सर्व काही बदलेल असं मला वाटायचं. मात्र ते मिळाल्यानंतर तुम्हाला खूप लवकर त्या गोष्टींची सवय होऊन जाते. मग नावीन्य काहीच वाटत नाही. पैसा आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर आता पुढे काय, असा प्रश्न मला पडतो.’

वाचा : तैमुरचे फोटो काढण्यामागे ‘या’ व्यक्तीचा हात

टेलिव्हिजनवर काम करताना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची अनेक कलाकारांची इच्छा असते. सुशांतचंही हेच स्वप्न होतं आणि ते पूर्णही झालं. आपण ज्यामागे पळत होतो त्या गोष्टी तर मिळाल्या, मात्र त्यापुढे काय हाच प्रश्न सध्या सुशांतला सतावत आहे. त्याचप्रमाणे भविष्यात कोणत्याही माध्यमात काम करण्याची तयारी असल्याचंही त्याने स्पष्ट केलं. ‘माध्यमांमध्ये मी भेदभाव करत नाही. मी पथनाट्यातही काम करू शकतो. त्यातही एक वेगळाच आनंद आहे किंवा एखाद्या लघुपटातही भूमिका साकारायला मला आवडेल,’ असं तो म्हणाला.

वाचा : ‘काम मिळवण्यासाठी अभिनेत्री ‘हे’ पाऊल उचलतात; १० वर्षांनी त्यालाच विनयभंगाचे नाव देतात’

‘एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ आणि ‘राबता’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेला सुशांत सध्या त्याच्या आगामी ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटातून सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is making sushant singh rajput feel cheated
First published on: 12-10-2017 at 15:58 IST