प्रेम, नाती या गोष्टींची अनेकदा काहीच शाश्वती नसते. कलाविश्वातील काही जोड्यांकडे पाहताना या गोष्टींचा बऱ्याचदा प्रत्यय येतो. ‘जज्बात… संगीन से नमकीन तक’ या कार्यक्रमाच्या एका भागातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळाली. ज्यावेळी एकेकाळी रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या गौरव चोप्रा आणि नारायणी शास्त्री या टेलिव्हिजन कलाकारांनी एकत्र हजेरी लावली होती.

सध्याच्या घडीला या दोघांच्या वाटा वेगळ्या असल्या तरीही एक काळ असा होता की त्यांच्याच नात्याविषयीच्या चर्चा टीव्ही वर्तुळात पाहायला मिळायच्या. त्यांच्या नात्याच दुरावा आल्यानंतर नारायणीने ब्रिटीश वंशाच्या स्टिव्हन ग्रेवर (टोनी) याच्याशी लग्नगाठ बांधली, तर गौरवनेही काही महिन्यांपूर्वी हितीशा चेरांदासोबचत आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. गौरव आणि नारायणी सध्या प्रकाशझोतात आले आहेत ते म्हणजे एका टेलिव्हिजन शोमध्ये एकत्र हजेरी लावल्यामुळे.

सूत्रांचा हवाला देत ‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सर्वप्रथम त्या दोघांनाही वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांच्या जोडीदारांसोबत बोलवण्यात आलं होतं. पण, माध्यमांसमोर येण्यास आपल्या जोडीदारांना संकोचल्यासारखं वाटत असल्याचं कारण त्या दोघांनी दिलं. त्यानंतर मग या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी गौरव आणि नारायणीला त्या कार्यक्रमात एकत्र येण्याविषयीची विचारणा केली. त्या दोघांनीही कोणतीच हरकत नसल्याचं सांगत कार्यक्रमात येण्याची तयारी दाखवली. कारण, आजही त्यांच्यातील मैत्रीचं नातं कायम टीकून आहे.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

कार्यक्रमाचा सूत्रसंचालक राजीव खंडेलवाल याने जेव्हा त्यांच्या नात्याविषयी विचारलं तेव्हा नारायणी म्हणाली, ‘गौरव आणि माझ्या नात्याविषयी तशी सर्वांनाच माहिती होती. पण, तुमच्या एक्ससोबत मैत्री करण्याचा जो काळ आहे, सहसा तेव्हा बराच संकोलचेपणा मनात घर करुन जातो. कारण तो काळच तसा असतो. पण, नंतर मात्र तुम्हाला त्याची सवय होते.’ नारायणीच्या म्हणण्याशी सहमत होत गौरवनेही त्यांच्यात आता खूप चांगली मैत्री असल्याचं सांगितलं. मुख्य म्हणजे या दोन्ही कलाकारांच्या जोडीदारांसोबतही त्यांचं मैत्रीपूर्ण नातं असून, बऱ्याचदा त्यांच्या भेटीगाठीसुद्धा होतात, असंही त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं.

विशिष्ट नात्यात कोणा एका व्यक्तीसोबत दुरावा आल्यानंतर त्या व्यक्तीशी सहसा सर्व नाती संपवण्यात येतात. पण, गौरव आणि नारायणीच्या नात्यात आलेल्या याच दुराव्यानंतर त्यांच्या आयुष्यात मैत्रीच्या नव्या नात्याचा बहर आला असं म्हणायला हरकत नाही.