वरिष्ठ सिनेअभिनेत्री सुभाषिनी अली यांना पद्मावती सिनेमाविरोधात होत असलेल्या विरोधात राजकीय फायदा घेतला जात असल्याचा संशय आहे. नवभारत टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या सिनेमाची निर्मिती अंबानींच्या कंपनीने केली असून त्यांच्या कंपनीविरोधात आंदोलन का करत नाहीत, असा प्रश्न सुभाषिनी यांनी विचारला आहे. सुभाषिनी अली या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आहेत. अजून सिनेमा प्रदर्शितही झालेला नाही आणि त्यावर वाद सुरू झाले. हे राजकीय कारस्थान असून यामुळे देशातील वातावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे मध्य प्रदेश येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या सुभाषिनी अली यांनी म्हटले.

सध्या सगळे मिळून संजय लिला भन्साळी आणि दीपिका पदुकोणचा विरोध करत आहेत. पण जी कंपनी या सिनेमाची निर्मिती करत आहे, त्याच्याबद्दल कोणाच्या मनातही साधा विचारही येत नाही. हे सगळं ठरवून केलेलं कारस्थान आहे. एवढंच बोलून त्या थांबल्या नाहीत सुभाषिनी पुढे म्हणाल्या की, आगामी गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद निर्माण केला जात असून गुजरातमध्ये राजपूत समुदायाची वोट बँक आहे. भाजप निवडणुकांमध्ये नेहमीच जातीचं राजकारण करतं. यावेळीही त्यांना हा वाद उकरुन काढला असल्याचा आरोप त्यांनी केला.

राजस्थानमध्ये आजही मुलींचे प्रश्न फार गंभीर आहेत. देशात मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक असताना त्यावर कोणीच चर्चा करत नाहीत. पण सिनेमांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींसाठी निदर्शनं केली जातात. राजकीय फायद्यासाठी कला- संस्कृतीवर हल्ला करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, ‘भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी तणाव निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या राज्यात पद्मावती सिनेमावर बंदी घातली असून हा वाद सेन्सॉर बोर्डाकडून सोडवले जाणं अधिक योग्य असेल,’ अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.