करोनामुळे सर्वच सणांच्या आनंदावर विरजण पडलं असून, दरवर्षी हर्षोल्हासात साजरा होणारा गणेशोत्सवही नियमांच्या चौकटीत साजरा होणार आहे. करोनाच्या वाढत्या प्रसाराचा धोका लक्षात घेऊन सरकारनं गणेशोत्सवासाठी नियमावली जारी केली आहे. तर गणेशोत्सवामुळे चाकरमान्यांना कोकणात जाण्याचे वेध लागले असून, यासंदर्भात राज्य सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईवर भाजपानं टीका केली आहे.

भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करून ठाकरे सरकारला सवाल केला आहे. “ग्रामपंचायतीना क्वारंटाइन सेंटरमध्ये गरम पाणी, शौचालये, औषधांसाठी ना विशेष निधी दिला. ना गणेशोत्सवाबाबत वेळीच निर्णय जाहीर केला. रेल्वे मंत्री विशेष गाड्या सोडायला तयार आहे, पण राज्य सरकारची मागणीच नाही. ग्रामस्थ आणि चाकरमान्यांत दरी वाढतेय. आमच्या कोकणी माणसांशी का राज्य सरकार असं वागतेय?,” असं शेलार यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- … तशीच हेराफेरी मुंबईत सत्ताधाऱ्यांची; वीजबिल आकारणीवरून शेलारांची टीका

मागील आठवड्यातच कोकण रेल्वे समन्वयक समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे बसेस आणि रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी केली होती. मुंबईतून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांकडे जायला रेल्वे सर्वात सोयीस्कर पर्याय आहे. परंतु, राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवासावर बंदी घातलेली असल्यामुळे रेल्वेने महाराष्ट्र राज्यांतर्गत आरक्षण दिलेले नाही व गणपती विशेष गाड्या देखील अद्याप सोडलेल्या नाहीत. तसेच, राज्य परिवहन सेवादेखील बंद असल्याने नागरिकांची प्रचंड अडचण होत आहे. तरी, आपण संबंधितांना सूचना देऊन मध्य व पश्चिम रेल्वेला उत्तर भारतात सोडलेल्या श्रमिक विशेष गाड्यांच्या धर्तीवर गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर योग्य दरात विशेष गाड्या सोडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केलेली आहे.