अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने विनयभंगाचा आरोप केला होता. #MeToo या चळवळीला अभिनेत्री तनुश्री दत्ताने भारतात सुरूवात केली ती याच आरोपांमधून. मात्र या संपूर्ण प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे अभिनेते नाना पाटेकर यांना या प्रकरणात दिलासा मिळाला आहे. कारण तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांचे पुरावे नाहीत असा अहवाल पोलिसांनी कोर्टात दाखल केला आहे. ओशिवरा पोलिसांचा चौकशी अहवाल कोर्टात दाखल करण्यात आला आहे.

हॉर्न ओके प्लीज या सिनेमातील एका आयटम साँगच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. २००८ मध्ये या सिनेमाचे शुटिंग सुरू असताना हा सगळा प्रकार घडल्याचे तनुश्री दत्ताने गेल्या वर्षी सांगितले. सुमारे दहा वर्षांनी तिने या प्रकरणाला #MeToo प्रकरणात वाचा फोडली. २००८ मध्ये हा वाद निर्माण झाल्यानंतर तनुश्री दत्ताने हा सिनेमा सोडला. तसंच ती परदेशात वास्तव्यास निघून गेली. गेल्या वर्षी तिने भारतात परतल्यावर अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. एवढंच नाही तर नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी, राकेश सारंग यांच्याविरोधात तनुश्रीने तक्रारही दाखल केली होती. मात्र कोर्टात पोलिसांनी जो अहवाल सादर केला त्यामध्ये नाना पाटेकर यांच्याविरोधात पुरावे नसल्याचे नमूद केले. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.