भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी संध्याकाळी अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यानंतर सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याप्रकरणी निषेध नोंदवला असून आरोपींना तात्काळ अटक केली जावी अशी मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे”.

आणखी वाचा- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड

“मी स्वतः मा. भीमराव (दादासाहेब) आंबेडकरजी यांच्याशी फोनवर चर्चा केली तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे,” अशी माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

आणखी वाचा- “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, विचारांवरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही”

Video : दादरमधील राजगृह म्हणजे आंबेडकरांच्या आठवणींचा ठेवा

प्रकाश आंबेडकर यांनी केलं शांतता राखण्याचं आवाहन
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी असं आवाहन केलं आहे. “मी सगळ्यांना व्हिडीओद्वारे आवाहन करतो आहे की सगळ्या आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी, ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातलं. पोलिसांनी त्यांचं कर्तव्य केलं. राजगृहाच्या आजूबाजूला आंबेडकरवाद्यांनी जमू नये, पोलीस त्यांचं काम करत आहेत. आपण सगळ्यांनी शांतता राखावी” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.