मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. दरम्यान, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रेल्वेसेवरही त्याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, आजही मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कार्यालयांना सुट्टी देण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टी च्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे तसेच, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेनं ट्विटरच्या माध्यमातून हे आवाहन केलं आहे.

आणखी वाचा- मुंबईत रात्रभर मुसळ’धार’; रस्ते जलमय, लोकलसेवा ठप्प

आणखी वाचा- मुंबईत २६ वर्षांतला विक्रमी पाऊस; सप्टेंबर महिन्यातील विक्रम मोडला

मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रेल्वेसेवरही त्याचा परिणाम झाला आहे. चर्चगेट ते अंधेरी दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं या स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या अंधेरी ते विरार दरम्यान लोकल सेवा सुरू आहेत. तर दुसरीकडे मध्य रेल्वे मार्गावरही रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशीदरम्यान रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेसेवा सुरू आहेत. आजही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

आजही मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी दिली. त्यांनी ट्विटद्वारे याविषयी माहिती दिली आहे. दरम्यान, सकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा येथे १२२.२ मिलीमीटर तर सांताक्रुझ येथे २७३.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहितीही त्यांनी दिली.