महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बचाव कार्यात मदत केलेल्या सर्व बचाव पथकांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विटर वरून सर्वांचे आभार मानले.

‘महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेले सर्व प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, हे सांगताना मला आनंद होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. ”एनडीआरएफ, भारतीय लष्कर, नौदल, हवाईदल, रेल्वे, पोलिस, स्थानिक प्रशासन या सर्वांनी एकत्र येऊन, समन्वयाने अतिशय कौशल्याने हे अभियान राबविले आणि सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका केली. या अभियानात सहभागी सर्वांचा मी अतिशय आभारी आहे आणि त्यांचे अभिनंदनही करतो,” असेही यावेळी म्हणाले.

या सर्व प्रवाशांना कल्याण ते कोल्हापूर या विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांची एनडीआरएफच्या चार तुकड्या, वायुदल आणि नौदल यांच्या मदतीने या सुखरुप सुटका करण्यात आली. सकाळपासूनच बचाव कार्य सुरु होते. सगळ्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्याचे आव्हान होतं जे लिलया पेलत एनडीआरएफ, वायुदल आणि नौदल आणि स्थानिकांनी मिळून प्रवाशांची सुटका केली आहे.