संदीप आचार्य

गेल्या महिन्याच्या तुलनेत करोना चाचण्यांचे प्रमाण दुप्पट केल्यानंतरही खबरदारी घेतल्यामुळे मुंबईतील करोना नियंत्रणात आला आहे. पालिकेच्या २४ विभागांपैकी २३ विभागांत करोना दुपटीचा कालावधी १०० दिवसांवर गेला असून आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जनतेने विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी केले आहे.

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही खूप मोठे असून बहुतेक रुग्णालयांत करोनाचे बेड मोठय़ा प्रमाणात रिकामे आहेत. महापालिकेने मुखपट्टय़ा न वापरणाऱ्यांवर केलेली कठोर कारवाई तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजनेच्या अंमलबजावणीमुळे मुंबईतील करोना आटोक्यात येण्यास मोठी मदत झाल्याचे चहल यांनी सांगितले. लालबाग-परळ, नायगाव, शिवडी, काळाचौकी या पालिकेच्या एफ-दक्षिण विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता २५६ दिवसांवर गेला असून रुग्णवाढीचा सरासरी दर ०.२७ टक्के झाला आहे. मुंबईत हा सर्वात कमी दर आहे. मुंबईचा करोना संसर्गाचा सरासरी दर १३२ दिवसांवर गेला आहे. गेल्या महिन्यात हाच दर ६८ इतका होता.

मुंबईची करोना परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आहे. व्यवहार पूर्वपदावर आल्यानंतर मुंबई पुन्हा गजबजू लागली आहे. मुखपट्टय़ा न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केल्यामुळे मुंबईचे चित्र बदलल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना चहल यांनी सांगितले. मुंबईतील व्यवहार सुरळीत होत असताना जे नागरिक नियम पाळणार नाहीत त्यांना कारवाईला सामोरे जावेच लागेल, असेही त्यांनी सांगितले.

आम्ही केलेल्या उपाययोजनांमुळे मृत्युदर गेल्या महिन्याच्या तुलनेत २.१ टक्कय़ांनी कमी झाला आहे. सप्टेंबर महिन्यात आम्ही रोज सात हजार चाचण्या करत होतो. आता रोज १६००० हून अधिक चाचण्या करत असूनही रुग्णसंख्या कमी झाली आहे.

मोहिमेचा रुग्ण शोधण्यासाठी उपयोग

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे हजारो मधुमेही व उच्च रक्तदाबाचे रुग्ण नव्याने सापडले. ज्येष्ठ लोकांची वॉर्डनिहाय यादी करता आली. त्यांना सावध करून योग्य काळजी घेत असल्याने करोनाचा प्रभाव कमी होण्यास मदत झाली आहे.  मुखपट्टय़ा न घालणाऱ्यांवर कारवाई सुरूआहे. प्रत्येक वॉर्डात मार्शल नेमण्यात आले आहेत. याबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, प्रत्येक वॉर्डात स्वतंत्र एजन्सी नेमण्यात आली असून जवळपास अडीच हजार मार्शल नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. जनताही जागरूक असल्याचे त्यांनी नमूद केले.