करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी मोठया प्रमाणावर जिथे गर्दी होते, अशी ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. वाशीतील एपीएमसी मार्केटने सुद्धा खबरदारी म्हणून काही उपायोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्केटमध्ये येणारा माल नाशवंत असतो, त्यामुळे मार्केट बंद ठेवणे शक्य नाही. तसे केल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

एपीएमसी मार्केटमध्ये ग्राहकांनी गर्दी करु नये, यासाठी होलसेल व्यापाऱ्यांनी ग्राहकांना मार्केटमध्ये येण्याऐवजी फोनवरुन ऑर्डर देण्याचे आवाहन केले आहे. व्यापारी टेम्पोच्या माध्यमातून ऑर्डर केलेला माल ग्राहकांपर्यंत पोहोचवतील. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये दररोज ५० हजार लोकांची ये-जा सुरु असते. ही संख्या निम्म्याने कमी करण्याचा एपीएमसी बाजारपेठेचा प्रयत्न आहे. त्याशिवाय रोग प्रतिबंधक उपायोजनांसाठी गुरुवार आणि रविवार असे दोन दिवस एपीएमसी बाजारपेठ बंद ठेऊन स्वच्छता करण्यात येणार आहे.

आणखी वाचा- Coronavirus: गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने घेतला हा मोठा निर्णय

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या भागातून हजारो किरकोळ व्यापारी भाजीपाला खरेदी करण्यासाठी दररोज एपीएमसी बाजारपेठेत येत असतात. एपीएमसी बाजार बंद ठेवणे शक्य नाही. कारण तसे केल्यास शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होईल. शिवाय शहरांमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होईल. म्हणून एपीएमसी मार्केट शक्य तितकी खबरदारी आपल्यापरीने घेत आहे.