मुंबईतील करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत चालली आहे. चाचण्याच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढेल असून, मुंबईतील पॉझिटिव्ही रेट काही दिवसांतच चार टक्क्यांवरून सहा टक्क्यांच्या पुढे गेला आहे. मागील पंधरा दिवसांत मुंबईतील रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली असून, महापालिकेच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबईकराना निर्वाणीचा इशारा दिला आहे. आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मुंबईतील करोना परिस्थितीसंदर्भात भाष्य केलं. मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येबद्दल बोलताना आयुक्त चहल म्हणाले,"वाढत्या रुग्णसंख्येमुळे धोका आहे. नागरिकांनी शिस्त पाळली नाही आणि आता हजारो लोकं विनामास्क फिरताना दिसत आहे. काल (२१ फेब्रुवारी) आम्ही १६ हजार ४०० लोकांकडून दंडवसुल केला. मागील तीन महिन्यात १६ लाख लोकांना दंड आकारला आहे. आता दररोज विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या २५ हजार लोकांकडून दंड वसूल करण्याचं उद्दिष्ट्य देण्यात आलं आहे," अशी माहिती आयुक्तांनी दिली. आणखी वाचा- मुंबई, पुण्यानंतर आता नागपुरातही निर्बंध लागू; शाळा, लग्नाचे हॉल बंद राहणार "माझ्याकडे दोन व्हिडीओ आलेत. एक व्हिडीओ चौपाटीवरचा होता. हजारो लोकं तिथं होते. तिथे विनामास्क लोकं फिरत होते. एक लग्नातील व्हिडीओ आला. तिथंही हेच दृश्य होतं. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. दंड ठोठावला. अनेक ठिकाणी पबवरही धाडी टाकल्या. हा सगळा बेशिस्तपणा आहे," अशा शब्दात आयुक्तांनी आपली नाराजी व्यक्त केली. "करोना संपला आहे, असं लोकांना वाटत आहे आणि लोकं जसं वागत आहेत, ते फार धोक्याचं आहे. त्यामुळे लॉकडाउन होणार की नाही हे लोकांनी ठरवायचं हे मुख्यमंत्री योग्यच बोलले आहेत. लोकांनी शिस्त पाळायला हवी. मास्क वापरायला हवा. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायला हवं. लग्न समारंभात लोकांनी गर्दी केली नाही, तर लॉकडाउनची वेळ येणारच नाही. पण, हजारोंच्या संख्येनं लोकं विनामास्क बाहेर फिरायला लागले, तर आपल्याला लॉकडाउन टाळताच येणार नाही. मुंबईसाठी पुढील ८ ते १५ दिवस फार महत्त्वाचे आहेत," असा इशाराआयुक्त चहल यांनी दिला आहे. चाचण्या वाढवल्या. करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे महापालिकेनं मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. शनिवारी १६,१३५ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी सहा टक्क्याहून अधिक अहवाल बाधित आले आहेत. तर ४३०० प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ४ टक्के अहवाल बाधित आले आहेत. आतापर्यंत ३१लाख ३३ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत.