खर्च मात्र दीड कोटींवरून ४७ कोटींवर

मुंबई : नदी नाल्यांमध्ये आलेला तरंगता कचरा अडवण्यासाठी पालिका यंदा आठ ठिकाणी नदी, नाल्यांच्या प्रवाहात ‘ट्रॅश ब्रूम’ म्हणजेच कचरा रोखणारे अडथळे बसवणार असून तीन वर्षांपूर्वी पालिके ने हाच प्रयोग केला होता. त्यावेळी ज्या नद्यांची निवड करण्यात आली होती त्याच नद्या यावेळीही निवडण्यात आल्या आहेत. तसेच तीन वर्षात या प्रयोगाचा खर्च दीड कोटींवरून तब्बल ४७ कोटींवर पोहोचला आहे.

नदी, नाल्यांमधून प्लास्टिक, थर्माकॉल तसेच इतर तरंगता कचरा समुद्रात जातो. त्यामुळे समुद्र दूषित होतोच पण भरतीच्या पाण्याबरोबर प्लास्टिक, थर्माकॉल किनाऱ्यावर येतात. त्यामुळे किनारे विद्रूप होतात. खारफुटीमध्ये हा कचरा अडकल्याने तेथील सजीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. तसेच नाल्यांमधील हा कचरा पालिकेच्या उदंचन केंद्रातील जाळ्यांमध्येही अडकतो. त्यामुळे ही यंत्रणा बंद पडल्याच्याही घटना घडल्या आहेत.

यावर उपाय म्हणून पालिकेने  तीन वर्षांपूर्वी चार नद्या व दोन नाल्यांवर तरंगते अडथळे लावले होते. त्यावेळी या प्रकल्पासाठी  पालिके ने १ कोटी १७ लाख रुपये खर्च के ले होते.  मात्र आता तीन वर्षांनी पुन्हा एकदा असेच अडथळे लावण्यात येणार आहेत. मात्र, आता त्यासाठी पालिका पुढील तीन वर्षांसाठी साधारण ४७ कोटी रुपये खर्च करणार आहे.

या प्रकल्पासाठीचा पालिकेचा खर्च जवळपास ४५ कोटी रुपयांनी वाढला असला तरी प्रकल्पाचा भौगोलिक विस्तार मात्र फारसा झाल्याचे दिसत नाही. यापूर्वी ज्या नदी, नाल्यांवर हे अडथळे बसवण्यात आले होते, त्यातीलच अनेक नाले आणि नद्यांवर आताही पालिका पैसे खर्च करणार आहे. यापूर्वी  दहिसर नदी, मिठी नदी, पोईसर आणि ओशिवरा नदीसह जुहू येथील ईर्ला आणि मोगरा नाला तसेच वरळी येथील लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशनजवळ हे ‘ट्रॅशबुम’ बसविण्यात आले होते. आता मिठी, वकोला, पोईसर, ओशिवरा, दहिसर नदीसह पश्चिाम  उपनगरातील गझदरबंध नाला, मोगरा नाला, मेन अव्हेन्यू या नदी नाल्यांमध्ये महानगरपालिका हे अडथळे बसवणार आहे. मिठी नदीत निसर्ग उद्यानाजवळ तसेच वांद्रे कुर्ला संकुल पुलाजवळ अशा दोन ठिकाणी हे अडथळे लावण्यात येणार आहे.

विरोधी पक्षांची टीका

पालिका करत असलेला खर्च हा यापूर्वीच्या तुलनेत खूपच जास्त असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी के ला आहे. या आधीचा प्रयोग किती यशस्वी होता याची प्रशासनाने आधी माहिती द्यायला हवी तसेच टप्प्याटप्प्याने हा प्रयोग करायला हवा अशीही मागणी त्यांनी के ली आहे. तर कचऱ्यावर आतापर्यंत पालिके ने कित्येक कोटी खर्च करूनही मुंबई दरवर्षी जलमय होते त्यामुळे हा प्रयोग तरी खात्रीचा आहे का, असा सवाल भाजपचे प्रवक्ते  भालचंद्र शिरसाट यांनी के ला आहे.

पालिकेचे समर्थन

यावेळच्या ट्रॅशब्रूमचे तंत्रज्ञान खूप अद्ययावत असून यात साचलेला कचरा उचलण्याचेही समाविष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. नदी नाल्यांमध्ये सर्वच ठिकाणी मनुष्यबळ वापरता येत नाही त्यामुळे  तिथे तंत्रज्ञान वापरावे लागते. तसेच या कं त्राटात तीन वर्षांसाठी देखभाल आणि प्रचालन यांचाही समावेश असल्यामुळे हा खर्च वाढला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.