महावितरणने राज्य सरकारच्या मान्यतेने भरमसाठ रकमेची बिले पाठवून सामान्य माणसाच्या पैशावर डल्ला मारला आहे. महावितरणची आर्थिक गरज भागविण्यासाठी केलेला हा घोटाळाच आहे, असा आरोप भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या परिषदेआधी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महावितरणच्या घोटाळ्याची ‘महावितरणचा काला चिठ्ठा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. गेल्या आठ महिन्यांपासून राज्य सरकार हे प्रत्येक विषयात चालढकल कशी करता येईल याचाच विचार करतंय, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आ. निरंजन डावखरे, सरचिटणीस श्रीकांत भारतीय व माजी आ. राज पुरोहित उपस्थित होते.

“करोना काळात सरासरी वीजबिल देण्याचा निर्णय राज्य सरकारने घोषित केलेला मात्र प्रत्यक्षात फक्त एप्रिल, मे आणि जून मध्ये सरासरी बिलं दिली. जूलै महिन्याचं प्रत्यक्ष रिडींगनुसार बिल देणार असं सांगून तब्बल दुप्पट-तिप्पट किंमतीची वाढीव बिलं वाटली गेली. महावितरणला त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी आणि विद्यूत पुरवठा सुरू ठेवण्यासाठी २० हजार कोटी रूपयांची आवश्यकता होती. राज्य सरकारने हतबलता दर्शवल्यामुळे मंत्रालयामध्ये बसून सामान्यांची अशा वाढीव बिलांच्या रूपाने लूट करण्याचा निर्णय खुद्द राज्य सरकारनेच घेतला. जवळपास १ लाखांहून अधिक ग्राहकांना ५ हजार युनिटपर्यंत वाढीव रिंडींग दाखवून वाढीव वीज बिल दिल्याचे उघडकीस आले आहे. अनेकांना वाढीव बिल दिल्याचे आणि त्यात सुधारणा केल्याचे महावितरणने मान्य केले”, असे सोमैय्या यांनी नमूद केले.

“राज्य सरकारने जुलै महिन्यात करण्यात आलेल्या रिडींगला स्थगिती द्यावी. जुलै महिन्याची बिलं मागे घ्यावीत. करोना काळात केलेली २० ते २२ टक्के दरवाढ रद्द करावी व वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी”, अशी मागणीही त्यांनी केली.

कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मुंबई, महामुंबई अशा राज्याच्या सर्व भागातून वाढीव वीजबिलांचे १०० नमुने गोळा केलेले ‘महावितरणचा काला चिठ्ठा’ उर्जामंत्र्यांना पाठवणार असून राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्यापुढे ही समस्या मांडणार असल्याचीही माहिती सोमैय्या यांनी दिली.