पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे मालगाडीचे दोन डबे घसरल्याने मुंबईकडे येणारी व गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. सांयकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. ही मालगाडी मुंबईकडे येत होती. या अपघातामुळे या मार्गावरील सर्व गाड्या जागीच थांबल्या आहेत. यामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांचाही समावेश आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळित होण्यास तीन ते चार तास लागतील अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या मालगाडीचे दोन डबे सफाळे येथे घसरले. डबे बाजूला घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी क्रेनही मागवल्याचे समजते. सांयकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक रखडली आहे.