शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे थोपविण्यात सरकारला अपयश आले असतानाच महसूल खात्याने नव्याने फर्मान काढून यापुढे अतिक्रमणे झाल्यास संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांमध्ये तक्रार नोंदविण्याचा आदेश दिला आहे.
काही वेळा ही अतिक्रमणे हटविताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यामुळेच गृह विभागाने पोलिसांना वेळीच माहिती द्यावी, अशी सूचना केली होती. यानुसार अतिक्रमणे झाल्यास ती पाडून टाकण्याची कारवाई करावी तसेच पोलिसांत तक्रार दाखल करावी, असा आदेश महसूल खात्याने दिला आहे. शासकीय जमिनींवर अतिक्रमणे झाल्यास तलाठी, मंडळ अधिकारी, स्थानिक वन अधिकारी, ग्रामसेवक, नगरपालिकांचे मुख्याधिकारी किंवा संबंधित विभागाचे स्थानिक अधिकारी यांच्यावर पोलिसांत तक्रार दाखल करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.