कुत्रा आपल्याला चावला तरी आपण कुत्र्याला चावत नाही असं उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदींसदर्भात विचारलेल्या प्रश्नावर कन्हैय्या कुमार यांनी दिलं आहे. मुंबई प्रेस क्लबमध्ये कन्हैय्या कुमार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांना असं विचारण्यात आलं की, “तुम्हाला लोकप्रिय करण्यामध्ये नरेंद्र मोदींचा सहभाग असल्यामुळे त्यांना तुम्ही धन्यवाद द्याल का?”. या खोचक प्रश्नाला तितकंच तिरकस उत्तर देताना कन्हैय्या कुमार यांनी ही प्रसिद्धी मिळण्यासाठी किती गमवायला लागलंय याचा दाखला दिला. अनेक धमक्या येतात, जाहीर सभांमध्ये हल्ले होतात, आवाज बंद करण्याचे प्रकार होतात, देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो असे अनेक दाखले देत ही प्रसिद्धी खडतर असल्याचे सांगितले.

हा सगळा त्रास नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून वाढल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच या प्रश्नातल्या नरेंद्र मोदींमुळे कन्हैय्या प्रसिद्ध झाले या संदर्भात बोलताना कन्हैय्या म्हणाले की कुत्रा माणसाला चावला तरी माणूस तर कुत्र्याला चावत नाही ना? त्यामुळे मी मोदींचे आभारच मानतो, त्यांना धन्यवाद देतो… ते यासाठी की त्यांच्यामुळे विरोधी शक्ती एकत्र आल्या आहेत. भाजपाविरोधात सगळ्या सेक्युलर संघटना एकत्र येणं हे घडून आलं त्यासाठी मोदींना धन्यवाद द्यायला हवेत अशी मार्मिक प्रतिक्रियाही कुमार यांनी व्यक्त केली.

नरेंद्र मोदीसरकारवर कठोर टीका करताना आधीच्या सरकारांमध्येही विरोधकांवर व्हिजिलन्स ठेवायची पद्धत होती परंतु आता ती जास्त प्रमाणात वाढल्याची टीका त्यांनी केली. देशाच्या संविधानाच्या रक्षणाची गरज प्रतिपादन करताना संविधानाच्या जागी अनेकजण मनुस्मृती आणण्याची भाषा करत असल्याचंही ते म्हणाले. आपण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असून संधी मिळाली तर निश्चितच लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहू असं सांगताना कन्हैय्या कुमार यांनी हिंदी भाषिक राज्यांमधून निवडणूक लढवण्यावर आपला भर राहील असे स्पष्ट केले.