काव्यवंतांची मैफल.. साहित्याच्या प्रांतात कवितेचे स्थान कायमच वरचे राहिले, याचे कारण तिच्यामध्ये असलेली अनेकार्थाची शक्यता. कमीत कमी शब्दांत जीवनाचा अखंड अनुभव साकारण्यासाठी मिळालेली शब्दसंपदा आणि त्यातून नेमकेपणाने व्यक्त होणाऱ्या भावनेलाही जोडल्या जाणाऱ्या अर्थाच्या नाना छटा यामुळे कवितेच्या प्रेमात पडलेला कोणताही रसिक तिची साथ सोडत नाही. येत्या २८ फेब्रुवारी रोजी ठाण्यात ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम ही काव्यप्रेमी रसिकांसाठी अप्रतिम संधी असणार आहे. ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘अभिजात’ या उपक्रमाचे पहिले सत्र ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात सायंकाळी सादर होणार आहे. कवितेच्या या मंचावर आपली स्वत:ची कविता सादर करण्यासाठी नाना पाटेकर, किशोर कदम ‘सौमित्र’, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, स्वानंद किरकिरे, प्रतीक्षा लोणकर असे शब्दांवर प्रेम करणारे तारांगण एकत्र येणार आहे. त्यांच्या बरोबरीनेच अशोक नायगावकर, नीरजा आणि मिलिंद जोशी हे ज्येष्ठ कवीही या मंचावर उपस्थित राहून कविता सादर करणार आहेत. मराठी कवितेच्या प्रांतातील एक अतिशय तरल आणि संवेदनशील नाव म्हणजे कुसुमाग्रज. तेही आपल्या कवितेबद्दल म्हणतात.. दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता खळखळे अडखळे सुके कधी फेसाळे परि अखंड शोधे वाट समुद्राकरिता कवीचे कवितेबद्दलचे हे मनोगत नुसते मनोज्ञच नाही, तर अंतर्मुख करायला लावणारेही आहे. अशा नामवंतांच्या कवितेचा आस्वाद घेत असतानाच ज्या कलावंतांनी आपले नाव वेगवेगळ्या कारणांसाठी रसिकांच्या मनात नोंदवले आहे, त्यांच्या अंतर्मनात डोकावणाऱ्या कविताही या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहेत. सर्वासाठी खुला.. : जे कवी म्हणून आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे राहिलेले आहेत, अशांच्या काव्यकृती कवितेच्या प्रेमात आकंठ बुडणाऱ्या रसिकांसाठी या मंचावर सादर होणार आहेत. ‘लोकसत्ता’चा हा ‘अभिजात’ उपक्रम वेगळी वाट चोखाळणारा आणि साहित्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणारा असल्याने शब्दांच्या पलीकडे नेणाऱ्या या कार्यक्रमाबद्दल रसिकांच्या अपेक्षा निश्चितच उंचावल्या आहेत. कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. प्रायोजक ‘वर्ल्ड वेब सोल्यूशन्स’ असून, तन्वी हर्बल्स, एमआयडीसी आणि मँगो हॉलिडेज आणि रुणवाल ग्रुप हे सहप्रायोजक आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्रह्मविद्या साधक संघ पॉवर्ड बाय असलेल्या या कार्यक्रमाचे बँकिंग पार्टनर ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड़, नॉलेज पार्टनर नेटभेट ईलर्निग सोल्यूशन्स आणि टेलिव्हिजन पार्टनर एबीपी माझा हे आहेत.