मुंबई-नागपूर द्रुतगती मार्गाचे काम गतीने करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरियन शिष्टमंडळाला दिले. एशियन इन्फ्रास्ट्रर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या वार्षिक सभेनिमित्त मुंबईत आलेले दक्षिण कोरियाचे उपअर्थमंत्री ह्य़ुंग क्वान को यांच्या शिष्टमंडळाने सह्यद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीस बोलत होते.

मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग हा सर्वात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असा जगातील एकमेव व्हावा. कोरियन कंपनीचे काम व तंत्रज्ञान उत्तम आहे, पण कामात गती हवी. जमीन अधिग्रहणाचे काम अंतिम टप्प्यात आहे, काम त्वरित होण्यासाठी कोरियन तज्ज्ञांनी पाहणी करावी. महामार्ग आणि रस्ते सुरक्षा याबद्दलच्या तंत्रज्ञानावरही अधिक भर द्यावा. रस्त्यामधील स्मार्ट घटक आणि स्मार्ट तंत्रज्ञानालाही प्राधान्य द्यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

स्मार्ट आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई-नागपूर द्रुतगती मार्गाचे काम त्वरित व गतीने करण्याची ग्वाही कोरियन शिष्टमंडळाने यावेळी दिली.

ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या वार्षिक सभेनिमित्त मुंबईत आलेले ब्रिटनचे अर्थमंत्री फिलिप हॅमोंड यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी सह्यद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत वाहतुकीमधील नवीन तंत्रज्ञान आणि फिनटेक धोरणावर चर्चा झाली. ब्रिटनमधील वाहतूक व फिनटेक प्रणाली अत्यंत उत्कृष्ट असून अशीच उद्यमस्नेही प्रणाली मुंबईत आणायची आहे. त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. महाराष्ट्राला तांत्रिक सहकार्य करण्याची आमची तयारी आहे असे सांगत फिलीप यांनी फडणवीस यांना ब्रिटनभेटीचे निमंत्रण दिले.

निधी मिळवण्यासाठी सरकारचे प्रयत्न

मुंबई समृद्धी महामार्ग हा देशातील सर्वात मोठा महामार्ग असणार आहे. या महामार्गामुळे नागपूर हे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टशी जोडले जाणार आहे. तसेच या मार्गावर २४ स्मार्ट सिटींची निर्मिती होणार आहे. या महामार्गामुळे कृषी क्षेत्राला मोठय़ा प्रमाणात चालना मिळून विकास दर वाढीस मदत होणार आहे. या महामार्गासाठीचे भूसंपादन जमीनधारकांच्या संमतीने केल्यामुळे विक्रमी वेळेत पूर्ण झाले असून ९३ टक्के जमीन ताब्यातही आली आहे. भूसंपादनाच्या या वेगळ्या पद्धतीची दखल नीती आयोगानेही घेतली आहे. या महामार्गासाठी निधी मिळविण्यासाठी ‘एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँके’बरोबर चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

‘एशियन इन्फ्रास्टक्चर इन्व्हेस्टमेंट बँके’च्या वार्षिक सभेनिमित्त आयोजित ‘शाश्वत पायाभूत सुविधा’ या विषयावरील परिसंवादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे माजी कार्यकारी संचालक पॉल स्पेझ, जागतिक बँकेचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ निकोलस स्ट्रेन यांनी या परिसंवादात सहभाग घेतला.शाश्वत विकास हा केंद्रबिंदू ठेवून महाराष्ट्र सरकार पायाभूत सुविधांची निर्मिती करत आहे. राज्याचा विकासदर १५ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक होणे आवश्यक आहे. राज्याने वाढते नागरिकीकरण लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढविण्यावर भर दिला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच महामार्गाची निर्मिती करत असताना वन्यजीवांना कोणतीही हानी पोचणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. जलसंवर्धनासाठी मोठय़ा धरणांऐवजी लहान लहान जलसंधारणाच्या कामावर लक्ष दिले आहे. तसेच सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला आहे. राज्यातील विकासांची कामे विशेषत: पायाभूत सुविधांच्या कामांच्या अमंलबजावणीवर मुख्यमंत्री वॉर रूमच्या माध्यमातून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे मेट्रोची कामे ही वेळेआधी सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.