केवळ दहा दिवस आधी मंडप उभारण्याची परवानगी; विनापरवानगी मंडपांवर त्वरित कारवाई मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे रस्ते, पदपथांवर उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या परवानगीबाबतचे नियम पालिकेने अधिक कडक केले आहेत. यापुढे गणेशोत्सवापूर्वी केवळ १० दिवसआधी मंडप उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून तत्पूर्वी अथवा परवानगी न घेताच उभारण्यात आलेले मंडप जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. गणेशोत्सव ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये येत असला, तरी मुंबईतील मोठय़ा मंडळांची तयारी दोन महिने आधीपासूनच सुरू होते. मोठमोठे देखावे उभारण्यासाठी दोन महिने आधीपासून मंडप उभारले जातात. अनेक ठिकाणी भररस्त्यात मंडप उभारले जातात. त्यामुळे किमान तीन महिने अनेक भागांतून पादचाऱ्यांनाही जाणे कठीण होते. या पाश्र्वभूमीवर पालिकेने गणेशोत्सवाच्या मंडपांना उत्सवाच्या दहा दिवस आधीपासूनच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ते, पदपथावर साजऱ्या करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाबाबत न्यायालयाने दिलेले आदेश लक्षात घेऊन पालिकेने मंडपाबाबतचे नियम कडक केले आहेत. आतापर्यंत गणेशोत्सव जवळ आल्यानंतर मंडप उभारण्यासाठी मंडळांकडून पालिकेकडे अर्ज करण्यात येत होते. मात्र आता गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी ३० दिवस आधी मंडळांना पालिकेकडे मंडप उभारणीच्या परवानगीसाठी अर्ज करावा लागणार आहे. या मुदतीनंतर कोणत्याही मंडळाचा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी केवळ १० दिवस आधी मंडप उभारण्याची परवानगी देण्यात येणार आहे. पालिकेकडून मिळालेल्या परवानगीची एक प्रत मंडपाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालिकेकडून देण्यात येणाऱ्या परवानगीची कागदपत्रे मिळाल्याशिवाय मंडळांना मंडप उभारता येणार नाही. परवानगी मिळण्यापूर्वीच उभारण्यात आलेले मंडप अनधिकृत समजून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवादरम्यान परवानगीविना मंडप उभारण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर कोणतीही तमा न बाळगता कारवाई करण्याची सूचना मंडळांना करण्यात आली आहे. परवानगी पत्रात नमूद केलेल्या आकारमाना इतकाच मंडप बांधणे मंडळांना बंधनकारक आहे. मात्र लहान आकारमानासाठी परवानगी घेऊन मोठा मंडप बांधल्याचे आढळल्यास अतिरिक्त भागावर कारवाई करण्यात येणार आहे. रस्ते, पदपथावर मंडपासाठी खड्डे खोदण्यास बंदी घालण्यात आली असून खड्डे खोदणाऱ्या मंडळांकडून प्रतिखड्डा दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. आतापर्यंत काही अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मंडपांसाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्यात येत होते. मात्र आता गणेशोत्सवामुळे वाहतूक आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही याबाबत वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस ठाण्याकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळणे सक्तीचे करण्यात आले आहे. सात हजार मंडळांच्या मंडपांचा अडसर मुंबईमधील तब्बल सात हजार छोटे-मोठे रस्ते आणि गल्लीबोळांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी रस्ता आणि पदपथावरच मंडप उभारणी केली जाते. मंडपामुळे पादचारी आणि वाहतुकीला फटका बसतो. त्यामुळे यंदा सुमारे सात हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांचा प्रश्न ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने रस्ते, पदपथावर साजऱ्या करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाच्या मंडपांसाठी २०१५ मध्ये धोरण आखले आहे. न्यायालयाचे आदेश आणि पालिकेच्या धोरणातील नियम लक्षात घेऊनच मंडळांकडून मंडप उभारण्यात येत आहेत. मात्र पालिकेने जारी केलेले नवे पत्रक जुलूमशाहीचे दर्शन घडवत आहे. ब्रिटिशांनाही लाजवेल अशी कृती पालिकेने केली आहे. अॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती