शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यावर नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या मालवण मतदारसंघातील पोटनिवडणूक राणे विरुद्ध शिवसेना या लढतीने भलतीच गाजली होती. आता ‘मातोश्री’च्या अंगणात पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना सामना रंगणार आहे. मालवणमध्ये राणे यांनी शिवसेनेला चारीमुंडय़ा चीत केले होते, आता शिवसेना उट्टे काढण्यासाठी रिंगणात उतरली आहे. शिवसेनेचा सामना करण्याचे आव्हान असतानाच गेल्या वेळी या मतदारसंघात २४ हजार मते मिळालेल्या एमआयएमने उमेदवार उभा करण्याचा घेतलेला निर्णय राणे यांच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. राणे यांनी आपल्या बालेकिल्ल्यात तेव्हा (२००५) शिवसेनेची धोबीपछाड केली होती. ती लढाई राणे यांच्या मालवणमध्ये झाले होती. आताची लढाई ‘मातोश्री’च्या अंगणात होत आहे. राणे यांनी शिवसेनेचा पराभव केल्यास शिवसेनेला ते फारच जिव्हारी लागणार आहे. यामुळेच शिवसेनेने सारी शक्ती पणाला लावण्याचा निर्णय घेतला आहे. सेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा शिवसेनेने शक्तिप्रदर्शन केले. राणर्े तयारीनिशी िरगणात उतरत आहेत. मुंबई काँग्रेसने राणे यांच्या मागे ताकद उभी करण्यावर भर दिला आहे. यामुळे राणे विरुद्ध शिवसेना हा पोटनिवडणुकीचा दुसरा अंक चुरशीचा ठरणार आहे.निरुपम यांचे कौतुकअशोक चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांच्या नियुक्तीस राणे यांनी आक्षेप घेतला होता. पोटनिवडणूक लढवायची असल्याने रविवारी शरद पवार यांची भेट घेतल्यावर आज राणे यांनी मुंबई काँग्रेसच्या मुख्यालयास भेट दिली. निरुपम यांचे कौतुक करतानाच आपल्या विजयाच्या माध्यमातून निरुपम यांच्या कारकीर्दीला विजयाने प्रारंभ करू, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.एमआयएमचा उमेदवार रिंगणात गेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमला अल्पसंख्याकबहुल मतदारसंघांमध्ये चांगली मते मिळाली होती. वांद्रे पूर्व मतदारसंघात गेल्या वेळी एमआयएमच्या उमेदवाराला २४ हजार मते मिळाली होती. पक्षाने सिराज खान यांची उमेदवारी जाहीर केली. अल्पसंख्याकांची काँग्रेसला खरोखरीच चिंता वाटत असल्यास काँग्रेसने या मतदारसंघात एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी व्यक्त केली. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करण्याच्या उद्देशानेच एमआयएमने उमेदवार उभा केला असून, हा पक्ष म्हणजे शिवसेना-भाजपची ‘बी टीम’ असल्याची टीका काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केली आहे.