मनसेचं शिष्टमंडळ उद्या (बुधवार) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली यांच्या नेतृत्वाखाली मनसेचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शिष्टमंडळाकडून शेतकऱ्यांचे प्रश्न राज्यपालांसमोर मांडण्यात येणार आहेत. अवकाळी पावसानं राज्यातील शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्यातच शेतकऱ्यांना त्वरित मदत देणं गरजेचं आहे. त्याच पर्श्वभूमीवर मनसेचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यपालांची भेट घेतली होती. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी विनंतीही त्यांनी केली होती. तर याच पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. परंतु आता अचानक ही भेट रद्द करण्यात आली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर गेले असल्यानं ही भेट रद्द झाल्याची माहिती शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी दिली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पक्षाचे नेते दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे राज्यापालांची नव्यानं वेळ घेऊन भेट घेतली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता राज्यपालांनी मदत जाहीर केली होती. २ हेक्टरपर्यंक शेती असलेल्यांना ही मदत जाहीर करण्यात आली आहे. खरीपासाठी प्रति हेक्टरी ८ हजार तर फळबागांसाठी १८ हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, ही मदत अपुरी असल्याची टीकाही विरोधीपक्षांकडून करण्यात आली होती.